मंगळवार, २ जुलै
राज्यातील महिलांना दिलासा देताना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारने “मुख्यमंत्री – बहिण माझी लाडकी”योजना जाहीर केली. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना सतराशे साठ अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी तर ही योजना नाही ना? असा प्रश्न संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी उपस्थित केला आहे.

राज्यभरातील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी भरमसाठ कागदपत्रांच्या जाचक अटी तात्काळ रद्द करुन ही योजना अधिक सोपी व सर्वसमावेशक करावी, तसेच लग्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी कतारी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य सरकारच्या योजनेनुसार १८ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची ही योजना आहे. राज्यात आर्थिक दुर्बल घटक, परितक्त्या, विधवा, निराधार अशा सर्व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असून योजनेच्या लाभासाठी त्यांनी १ जुलै ते १५ जुलै दरम्यान नोंदणी करायची आहे. गरजू महिलांना या योजनेचा हा लाभ खरोखर मिळणार असेल, तर राज्य शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र केवळ निवडणुकीपुरती घोषणा करुन मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना असेल तर नागरिकांची ही फसवणूक नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
“मुख्यमंत्री – बहिण माझी लाडकी” योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना आधारकार्ड, डोमिसाईल, जन्मदाखला, बँक पासबुक, रेशनकार्ड, पासपोर्ट फोटो, मॅरेज सर्टिफिकेट, गॅझेट(लग्नाच्या आधीच्या नावाचे), रुपये अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला अश्या भरमसाठ कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असून अपूर्ण असलेले प्रत्येक कागदपत्र बनवायला सुमारे आठ ते पंधरा दिवसांचा शासकीय कालावधी लागतो.
अनेकदा सेतू सुविधा केंद्राची वेबसाइटदेखील एरर दाखवत आहे. अनेक गोरगरीब महिलांकडे मॅरेज सर्टिफिकेट अथवा गॅझेट नाही. त्यामुळे ह्या योजनेपासून महिला वंचित राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सरकारने या भरमसाठ कागदपत्रांच्या जाचक अटी तात्काळ रद्द करुन ही योजना अधिक सोपी व सर्वसमावेशक करावी. तसेच लग्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे.
मागणीच्या पूर्ततेसाठी मुख्यमंत्री कार्यालय, महिला व बालविकास विभाग, राज्य महिला आयोग यांना देखील निवेदन दिले जाणार असून राज्य सरकारने ही योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी वरील वस्तुस्थितीचा विचार करावा, असे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी म्हटले आहे.
यासंबंधीच्या तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर अमर कतारी, भाऊसाहेब हासे, युवासेनेचे अमित चव्हाण, अक्षय बिल्लाडे, पप्पू कानकाटे, इम्तियाज शेख, फैसल सय्यद, परवेज शेख, इमरान सय्यद, अमोल डुकरे, अनुप म्हाळस, रवि गिरी, शरद कवडे, अक्षय गाडे, त्रिलोक कतारी, शीतल हासे, सांगिता गायकवाड, वैशाली वडतल्ले, राजश्री वाकचौरे, प्रशांत खजुरे, प्रकाश चोथवे, वेणुगोपाल लाहोटी, प्रथमेश बेल्हेकर, मुकेश काठे, फैरोज कतारी, गणेश धात्रक, सागर भागवत, युवासेनेचे वैभव अभंग, गोविंद नागरे, दीपक वन्नम, दीपक साळुंखे, विजय सातपुते, राजू सातपुते, पंकज पडवळ, योगेश खेमनर, लखन सोन्नर, गुलाब कोकाटे, सचिन साळवे, संभव लोढ़ा, जयदेव यादव, अनिल खुळे, ब्रम्हा खिडकी, रंगनाथ फटांगरे, प्रविन चव्हाण, ओंकार सस्कर, जीतू दर्वे, संकेत खुळे, सचिन पावबाके, नीलेश गुंजाळ, अजीज मोमिन, नारायण पवार, सदाशिव हासे, प्रवीण कड़लग, सुनील घुले आदी शिवसैनिकांच्या सह्या आहे.


