गुरुवार ४ जुलै
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची साथ सोडत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता मोरे यांनी आंबेडकरांचीही साथ सोडत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ठाकरे गटाकडून मोरे विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
https://x.com/vasantmore88/status/1808791238285668776?s=19
पुण्याच्या मोरे यांनी इंजिन सोडलं, रोड रोलरवर चढले आता तेथून खाली उतरत मशाल हाती घेण्याचा नवा राजकीय निर्णय मोरे यांनी घेतला आहे.
राज ठाकरेंचे विश्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीत मनसेची साथ सोडली. काँग्रेस राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. शिवाय त्यांना पुणे लोकसभेची उमेदवारीही मिळाली. पण मोरे त्यात त्यांचा पराभव झाला. शिवाय त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता वसंत मोरेंनी नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ते वंचितची साथ सोडणार असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत, विनायक राऊतही उपस्थित होते. त्यांच्या पक्षा प्रवेशाची तारीखही आता निश्चित झाली आहे.
मोरे यांचा पक्ष प्रवेश ९ जुलैला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभेत शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी मोरे यांनी प्रयत्न केले होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. पण आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असल्याने मोरे यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. आता मात्र मोरे यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मनसे, वंचितनंतर मोरे आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
कोण आहेत वसंत मोरे?
वसंत मोरे हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. ते पुणे मनसेचे शहर अध्यक्षही होते. पालिका अधिकाऱ्याची गाडी त्यांनी हातोड्याने फोडली होती. त्यानंतर ते चर्चेत आले होते. एक आक्रमक नेते म्हणून त्यांची पुण्याला ओळख आहे. पुणे लोकसभेची जागा मनसेने लढवावी, अशी त्यांची मागणी होती. तशी इच्छाही त्यांनी राज ठाकरेंकडे व्यक्त केली होती. राज यांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणूनही त्यांची ओळख होती. पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. शिवाय त्यांचे आणि अमित ठाकरे यांचेही बिनसले होते. त्यामुळे वसंत मोरे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला.



