अनंत पांगारकर
बुधवार, १० जुलै | संगमनेर
महावितरण कंपनीकडून सध्या वीज ग्राहकांची विज बिल आकारणीमध्ये मोठ्या प्रमाणात लूटमार सुरू आहे. अशातच संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या महावितरणच्या अंतर्गत चाळीस गावांचा कारभार रामभरोसे सुरू आहे. महावितरणच्या आशीर्वादाने कर्जुलेपठार अंतर्गत येणाऱ्या वीज उपकेंद्रात मोडणारी गावे दोन दिवसांपासून अंधारात आहे.
या संदर्भात या भागातील नागरिक आणि संगमनेरमधील पत्रकार बाबासाहेब कडू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास वस्तुस्थिती आणून दिल्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम या भागातील कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांनी दाखवत आपल्या बेजबाबदारीचे दर्शन घडविले आहे. वीज उपकेंद्र अंतर्गत मोडणारी गावे अंधारात असताना थोरात यांनी आपले दोन्ही मोबाईल स्विच ऑफ ठेवत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला.
पठार भागातील कर्जुले पठार उपकेंद्र अंतर्गत कर्जुले पठार, सारोळे पठार, सावरगाव घुले, वरुडी पठार, जवळे बाळेश्वर, महालवाडी, गुंजाळवाडी पठार या महत्त्वाच्या गावांसह चाळीस गावांना वीज पुरवठा केला जातो. या उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने या भागातील वीजपुरवठा बंद होता.
याची माहिती कनिष्ठ अभियंत्याने आपल्या वरिष्ठांना कळविणे आवश्यक होते मात्र त्यांनी कोणतीही माहिती पहिल्या दिवशी वरिष्ठांना दिली नाही. हा प्रकार त्यांनी दुसऱ्या दिवशी वरिष्ठांना कळविला. पत्रकार बाबासाहेब कडू यांनी देखील या प्रकाराची माहिती मुख्य अभियंता अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता पाटील यांना दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी स्थानिक वायरमनला याबाबत सूचना केल्या तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करत दोन दिवसानंतर काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरू झाला. तब्बल दोन दिवसानंतर या उपकेंद्रातील तांत्रिक बिघाड काढण्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांच्याकडून देण्यात आली.
दरम्यान महावितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला सातत्याने पाठीशी घातले जात आहे. संपूर्ण पठार भाग अंधारात असताना भ्रष्टाचाराच्या कुंपणाखाली वावरणाऱ्या या कंत्राटदाराला वीज वितरण कंपनीतील अधिकारीच पाठीशी घालत असल्याचा आरोप पठार भागातील नागरिकांनी केला आहे.

महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण करणार…
कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांचे काम समाधानकारक नाही. ते ग्राहकांना कायमच अरेरावीची उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. पठार भागातील अनेक गावांचा आणि शेती पंपांचाही विजेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी या भागाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याकडेही ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. त्यांनी कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांना याप्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचनाही केल्या होत्या. मात्र कनिष्ठ अभियंता घारगाव यांनी या आदेशालाही केराची टोपली दाखवली. येथील कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांची तातडीने बदली करावी. संपूर्ण पठार भाग अंधारात असताना थोरात उपकेंद्राकडे फिरकले देखील नाही. नागरिकांचे सातत्याने फोन येत असल्याने या कर्तव्यदक्ष कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांनी आपली दोन्ही मोबाईल बंद ठेवले. त्यानंतर वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर उपकार्यकारी अभियंता पाटील यांनी संबंधित सबस्टेशन अंतर्गत असणाऱ्या वायरमन लोकांना सूचना देऊन हा वीज पुरवठा रात्री ९ वाजता सुरू केला. अनेक दिवसापासून या भागातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असतो, यावर महावितरण कंपनीने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा उपोषण करण्याचा इशारा पत्रकार बाबासाहेब कडू यांनी दिला आहे.


