मुंबई | प्रवीण पुरो
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानने चुरस वाढली होती. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी जय्यत तयारी केली होती. अंतिम निकालात महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे.
विजयी उमेदवारात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, प्रज्ञा सातव, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे , भावना गवळी, कृपाल तुमाने आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. तर अकराव्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस झाली. यात शेवटच्या फेरीत जयंत पाटील पराभूत झाले.
ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणूक चूरशीची झाली होती. नार्वेकरांसाठी उद्धव ठाकरेंनी धावाधाव केल्याचं बघायला मिळालं. गुरुवारी (११ जुलै) उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांचं मार्गदर्शन केलं. यावेळी ठाकरे गटाकडून व्हीप देखील जारी करण्यात आला. तसंच मतदान कशाप्रकारे करायचं याचा डेमो देखील यावेळी आमदारांना दाखवण्यात आला. काँग्रेस पक्षाकडूनही आमदारांना व्हीप बजावण्यात आला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुरुवारी रात्री उशिरा आपल्या आमदारांसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये बैठक घेतली. यावेळी शिवसेना शिंदे गटाकडूनही व्हीप बजावण्यात आला होता. तसंच मतदान कसं करावं, याची सर्व माहिती आमदारांना सांगण्यात आली. ‘द ललित’ हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तर ‘प्रेसिडेंट’ हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाची बैठक पार पडली. या बैठकींमध्येही व्हीप जारी करण्यात आला होता.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्यानं निवडणुकीची रंगत फारच वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष अगोदरचे हेवेदावे विसरुन एकमेकांच्या भेटीगाठी घेतानाचं चित्र विधान भवनात दिसून आलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीकडील ६४ मतांचा विचार केला असता त्यांची पाच मतं फुटली आहेत. मविआसोबत असलेल्या शंकरराव गडाख आणि विनोद निकोले या दोन आमदारांची मतं मोजली असता मविआकडील एकूण ७ मतं फुटल्याचं समोर आलं आहे. यावर बोलताना जयंत पाटील यांनी माझी १२ मतं मला मिळाली असून काँग्रेसची काही मतं फुटली असल्याचं म्हटलं. महाविकास आघाडीच्या एकूण मतांपैकी ५ मतं फुटल्याचं स्पष्ट झालं. महाविकास आघाडीकडे एकूण ६४ मतं होती. त्यापैकी प्रज्ञा सातव यांना २५, मिलिंद नार्वेकर यांना २२ आणि जयंत पाटील यांना १२ मतं मिळाली.
महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडे असलेले आमदारांचे संख्याबळ पाहता ११ व्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर यांना संघर्ष करावा लागेल, असे चित्र होते. पण विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मतमोजणी सुरु झाल्यानंतर २७४ मतांची ११ गठ्ठ्यांमध्ये विभागणी करण्यात आली. या मतांची मोजणी सुरु झाली तेव्हा पहिल्या टप्प्यातच मिलिंद नार्वेकर यांनी अनपेक्षितपणे मोठी आघाडी घेतली. मिलिंद नार्वेकर यांच्या मतांची गाडी एक-एक करुन पुढे सरकत होती. पहिल्या टप्प्यात त्यांच्यामागे असलेल्या उमेदवारांनी मुसंडी मारत विजय मिळवला. भाजपच्या योगेश टिळेकर, पंकजा मुंडे आणि अमित गोरखे यांनीही मोठी आघाडी घेत पहिल्या तासाभरातच विजय मिळवला.
शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वतःच्या पक्षाचा एकच आमदार होता. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने त्यांचे १५ आमदार सभागृहात होते. त्यामुळे, जयंत पाटील यांच्याकडे १६ मते होती. जयंत पाटील यांना विजयासाठी आणखी ७ मतांची जुळवाजुळव करावी लागणार होती. पण, त्यांना ७ मतांची जुळवाजुळव करणे शक्य झालं नसल्याचं दिसून आलं.
विजयी उमेदवार
भाजप – योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत
शिवसेना (शिंदेगट) – भावना गवळी, कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
काँग्रेस – प्रज्ञा सातव
शिवसेना (ठाकरेगट) – मिलिंद नार्वेकर


