शनिवार, २७ जुलै
पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे काम दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून संगमनेरमध्ये सुरू आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या कामाची दखल काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोस्कोत घेतली गेली असून तालुक्यात वृक्षांची संख्या वाढली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट, युवक काँग्रेस आणि कऱ्हे ग्रामस्थांच्यावतीने संगमनेरजवळ नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हे घाटामध्ये शनिवारी थोरात यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी सायखिंडी डोंगरावरून वाजत गाजत मोठ्या जल्लोषात या अभियानाची सुरुवात केली होती. अभियानाआधी उघडे बोडके असलेले डोंगर आता हिरवेगार दिसू लागले आहेत. अभियानाच्या माध्यमातून तालुक्यात पर्यावरण संवर्धन वाढीस लागले असून झाडांची संख्या वाढली आहे.
अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला आहे. संगमनेर तालुक्यातील ११ डोंगरांवरती वृक्षारोपण केले जात असून आज एसएमबीटी संस्थेच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. या वृक्षांचे संवर्धन व जपणूक अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येकाने या पर्यावरण चळवळीत सहभागी होताना जास्तीत जास्त वृक्षांचे संवर्धन करा, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी आमदार तांबे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. बंद कारण या अभियानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पर्यावरणाच्या लोक चळवळीत विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग राहिला आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक नागरिकांवर देण्यात आली आहे.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जात असून यात नागरिकांसोबत विद्यार्थी, युवक, महिलांचाही सहभाग आहे. नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करणे आवश्यक आहे.
जगभर निर्माण झालेल्या कोरोनाच्या संकट काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना समजले आहे. वृक्षांच्या माध्यमातून ऑक्सिजन मिळत असल्याने, ऑक्सिजनची निर्मिती करणारे वृक्ष आपण यापुढील काळात जपले पाहिजे. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली पाहिजे. – डॉ. जयश्री थोरात.


