महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली सुसंगतता आणि लोकप्रतिनिधींचे सार्वजनिक वर्तन या विषयावर आमदार सत्यजीत तांबे यांनी समाजमाध्यमाद्वारे आपले परखड मत व्यक्त केले आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या विविध चर्चांच्या पार्श्वभूमीवर, शिवाजी महाराज नेमके कोण होते आणि त्यांचे स्वराज्य कोणत्या मूल्यांवर उभे होते, यावर नवीन पिढीमध्ये मंथन होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार तांबे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रामुख्याने कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा संदर्भ देत, ३९ वर्षांनंतरही या पुस्तकाचे महत्त्व अबाधित असल्याचे सांगितले. शाळेत शिकवले जाणारे महाराज आणि प्रत्यक्ष इतिहासातील महाराज यांच्यातील तफावतीबद्दल त्यांच्या कन्या अहिल्या हिने उपस्थित केलेल्या प्रश्नाचा उल्लेख करत, तांबे यांनी आजच्या पिढीपर्यंत महाराजांची खरी आणि सर्वसमावेशक ओळख पोहोचवण्यावर भर दिला आहे.
यावेळी त्यांनी २०१५ मधील एका घटनेची आठवण करून दिली, जेव्हा कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर अहमदनगर शहरात प्रबोधनासाठी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या १०,००० प्रतींचे वाटप करण्यात आले होते. महाराजांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना सोबत घेऊन उभारलेले स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी विचारांचे प्रतीक होते. राजाने रयतेचा छळ करण्याऐवजी रयतेला केंद्रबिंदू मानून राज्यकारभार करावा, हीच छत्रपतींची शिकवण आजच्या महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही चर्चा केवळ वादासाठी मर्यादित न राहता, ती अभ्यासाच्या आणि पुढील पिढीला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार तांबे यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी आमदार संजय गायकवाड यांच्या व्हायरल झालेल्या संभाषणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘परस्त्रीला आई मानण्याचा’ आणि शत्रूपक्षातील स्त्रियांचाही आदर राखण्याचा जो पवित्र दंडक घालून दिला होता, त्याचे उल्लंघन करणाऱ्या शब्दांचा वापर करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अशा प्रकारच्या भाषेमुळे आणि वर्तनामुळे ‘लोकप्रतिनिधी कसा नसावा’ यावरही समाजात चर्चा सुरू झाली असून, स्त्रियांचा अनादर करणाऱ्यांना महाराज कधीच माफ करणार नाहीत, असे तांबे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
रयतेच्या स्वराज्यातील नैतिक मूल्यांची जपणूक करणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची आणि विशेषतः लोकप्रतिनिधींची कर्तव्य असल्याचे त्यांनी या निमित्ताने अधोरेखित केले आहे.
आमदार तांबे यांनी नेमके काय म्हटले आहे वाचा खालील लिंक मध्ये…
https://www.facebook.com/share/p/1F8xEjgttU/






