रविवार, २८ जुलै
संगमनेर – केंद्रातील भाजप सरकारने स्वायत्त असलेल्या ईडी, सीबीआयसारख्या संस्था आपल्या गुलाम बनविल्या. दबावाचे राजकारण सुरू केले. देशात महागाई, बेरोजगारी वाढीस लागले असून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणूस अडचणीत आला असताना त्याकडे सरकारने लक्ष दिले नाही. प्रचंड जातीभेद आणि घमेंड असलेल्या केंद्रातील भाजप सरकारला रोखण्याचे काम महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि येथील जनतेने केले आहे.
संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी येथे आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून ५ कोटी २७ लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते.
यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, दिलीप साळगट यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
थोरात म्हणाले, राज्यात सध्या अस्तित्वात आलेले सरकार जनतेला मान्य नाही. या सरकारमध्ये ताळमेळ नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार आहे. राज्य सरकारच्या निवडणुकीपुरत्या असणाऱ्या फसव्या घोषणांना फसू नका. राज्यात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपल्याला मान मिळतो आहे. जनतेचे हे प्रेम असून आगामी काळात सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे.
दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारे निळवंडे धरण व त्याचे कालवे आपण पूर्ण केले. तालुक्यातील सहकारी संस्थांसह येथील चांगल्या वातावरणामुळे तालुक्याचा लौकिक राज्यात निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.
खासदार वाकचौरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. नाशिक पुणे रेल्वे संदर्भात हा मार्ग संगमनेर वरूनच जावा यासाठी आपण दिल्ली दरबारी पाठपुरावा करणार आहोत.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले, थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकासाची गंगा आली आहे. त्यांनी सर्वांना सोबत घेत कायम काम केले असल्याने तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणून आपण सर्वजण त्यांचा आदर करतो. मनाचा मोठेपणा असलेले आमदार थोरात हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वात पुढचे नाव असून सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे.
यावेळी डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात आदींची भाषणे झाली.


