शनिवार, ०३ ऑगस्ट
विशेष प्रतिनिधी | मुंबई
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांचे नियोजनही सूरू आहे. असे असताना आता ”महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता, उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसचे इतके खासदार निवडून आलेत, असे विधान करत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आघाडीत मिठाचा खडा टाकला आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब शिर्डीत साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या काही जागांवर दावा करणार असल्याचा प्रश्न केला होता. यावर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी कॉग्रेसची चांगलीच कान उघडणी केली आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा एकही खासदार नव्हता. आम्ही तिघे एकत्र आलो. विशेष करून उद्धव ठाकरे यांनी विशेष भूमिका बजावल्याने काँग्रेस पक्षाचे एवढे खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या आधी आपला एकही खासदार नव्हता हे आनंदाच्या भरात काँग्रेसचे नेते विसरले असतील. मात्र प्रत्यक्षात जागा वाटपाचा चर्चेला बसतील त्यावेळी याचे भान काँग्रेसला येईल असा उपरोधीत टोला भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. सध्या काँग्रेसकडून मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. मुंबईत काँग्रेसकडून मुंबईतील सर्वच ३६ मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे निरीक्षक कोणत्या उमेदवाराला पसंती द्यायची आहे, याचा आढावा घेणार आहेत. हा आढावा घेतल्यानंतर संपूर्ण अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर तो वरीष्ठांकडे सोपवला जाणार आहे.
काँग्रेसकडून मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी १५ विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईतील मलबार हिल, धारावी, भायखळा, वडाळा, अणुशक्ती नगर, चांदिवली या काही मतदारसघांवर काँग्रेस दावा करणार असल्याचे बोललं जात आहे. यातील काही मतदारसंघ हे ठाकरे गटाच्या वाट्याला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


