महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची भक्कम सत्ता असताना आणि तालुक्यात महायुतीचे आमदार कार्यरत असतानाही, संगमनेरमध्ये पक्षाची झालेली दयनीय अवस्था सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. “महाराष्ट्र संवाद न्यूज”ने या दुर्दैवी स्थितीवर आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे निर्माण झालेल्या अस्तित्वाच्या संकटावर प्रकाश टाकल्यानंतर, आता भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे चव्हाट्यावर आला आहे.
या घटनेनंतर पक्षातील दोन्ही गट एकमेकांवर थेट पत्रकबाजी करत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण अधिकच तापले आहे. एकेकाळी विधानसभा निवडणुकीपर्यंत तालुक्यात वर्चस्व राखणारा हा पक्ष आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी धडपडत असल्याचे नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केले असून, नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या संघर्षाच्या केंद्रस्थानी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा ओबीसी महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा कांचन भरत ढोरे आणि संगमनेर शहर सरचिटणीस यांच्यातील वाद उभा राहिला आहे. ढोरे यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. केवळ नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे खरे रूप समोर आणताना, ढोरे यांनी असा दावा केला की, ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षीय उमेदवारी नाकारून शिवसेनेच्या (शिंदे गट) तिकीटासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, त्यांना निष्ठावान महिला कार्यकर्त्यांवर आरोप करण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. ज्यांचे स्वतःचे पक्षवाढीसाठी शून्य योगदान आहे आणि जे केवळ पदाच्या हव्यासापोटी संघटनेचे नुकसान करत आहेत, त्यांनी महिला अध्यक्षांच्या पदराआडून इशारे देण्याऐवजी स्वतःच्या कार्याचा लेखाजोखा मांडावा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
ढोरे यांनी आपल्या पत्रात स्वतःच्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा आणि त्यागाचा दाखला दिला आहे. केवळ आर्थिक ताकद कमी असल्याने आपले तिकीट नाकारण्यात आले, पक्षासाठी झटणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य महिलेचे तिकीट कापून स्वतःच्या पत्नीला दिले तेव्हा या सरचिटणीसांना अन्यायाचा विसर पडला होता का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ज्या प्रभागातून तिकीट मिळवण्यासाठी धडपड केली, त्या प्रभागात किंवा शहर हद्दीतही न राहणाऱ्या व्यक्तींनी नैतिकतेवर भाष्य करणे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यांनी स्वतःच्या सोयीनुसार आर्थिक तडजोडी करून तिकीट वाटप केले आणि पक्षाच्या हिताला तिलांजली दिली, अशांची आधी त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणीही ढोरे यांनी केली आहे.
पक्षाची वाताहात कशामुळे झाली, याचा खुलासा करण्याऐवजी सरचिटणीस आणि महिला शहराध्यक्षांनी संगनमताने वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. बाळासाहेब थोरात यांना गेल्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ काळात संगमनेरमधून भाजपला पूर्णपणे नष्ट करता आले नाही, ते काम आजच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झाले असून, या अपयशाची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
नगरपालिका निवडणुकीतील अपयश झाकण्यासाठी आणि आर्थिक देवाणघेवाणीची प्रकरणे दाबण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असल्याचा दावा ढोरे यांनी केला आहे. या अंतर्गत कलहामुळे संगमनेर भाजपची झालेली नामुष्की वरिष्ठ नेत्यांच्या दरबारी पोहोचली असून, आता यावर काय कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






