रविवार, ११ ऑगस्ट
मुंबईतील काही जणांना माज आला आहे, तो माज उतरवयाचे औषध मराठ्यांजवळ आहे. महाराष्ट्रातले जेवढे-जेवढे माजलेले वळू आहेत, त्यांना कात्रजचा घाट दाखवू. त्यांनी मला घेरायचं ठरवलं आहे, पण आपण त्यांच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाऊ, असा निर्धार व्यक्त करत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली रविवारी पुण्यात आली. सोमवारी ही रॅली अहमदनगर मध्ये येत आहे. या रॅलीला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत असून कात्रजमध्ये जरांगे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
जरांगे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मला साथ द्या, मागे हटू नका, मी देखील आता मागे हटणार नाही. त्यांनी मला घेरायचं ठरवलं आहे, पण आपण त्यांच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाऊ, असा निर्धार व्यक्त केला.
महाराष्ट्रातील मराठ्यांमध्ये एकी नाही, असे सांगत काही लोक आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. काहीजणांनी आपल्याला खूप हिणवलं. मात्र पुणेकरांनी याला जबरदस्त प्रत्युत्तर दिल आहे. मराठा आरक्षण प्रश्न पुणेकरांनी आपली एकजूट दाखवून दिली आहे. आरक्षण मिळेपर्यंत अशीच एकजूट दाखवा.
तुमची लेकरं मोठी व्हावीत, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान आता माझा जीव गेला तरी मी मागे हटणार नाही, असा निर्धार यावेळी मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला.


