विशेष प्रतिनिधी / मुंबई
राज्यातल्या युती सरकारपासून महाराष्ट्राची सुटका करणं हे आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे, अशा परिस्थितीत आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे, एकजूटीने लढायचं आहे, सरकार बदलायचं आहे, असा संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याशिवाय गत्यंतर नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
शुक्रवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला पवार मार्गदर्शन करत होते. सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले आणि शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्रातल्या मोदी सरकारची लक्तरं काढली.
या निर्धार मेळाव्यात शरद पवार म्हणाले की, सगळे जण बोलले की राज्याची निवडणूक तीन महिन्यांवर आहे. पण राज्याची निवडणूक केवळ दोन महिन्यांवर आहे. त्यामुळे आता आपल्याकडे दोन महिन्यापेक्षाही कमी दिवस आहेत. या कमी दिवसांमध्ये मविआतील तिन्ही पक्षांनी आणि मित्रपक्षांनी देखील सामान्य लोकांमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या परीवर्तनाचा विचार लोकांमध्ये रुजवला पाहिजे. महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर सरकार बदलण्याशिवाय गत्यंतर नाही. हे सत्ताधारी कशा पद्धतीने चुकीच्या रितीने सत्तेचा वापर करता आहेत, हे लोकांना जाऊन सांगावं लागेल, असं शरद पवारांनी सांगितलं.
राज्य सरकारने एक नवीन कायदा आणण्याचा निर्णय घेतला होता. जन सुरक्षा कायदा. तो विधानसभेत मांडला. आपल्या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री आणि सभा अध्यक्षांकडे मागणी केली की हा कायदा थांबवा. विरोधकांमुळे हा कायदा थांबविण्यात आला. या कायद्यानुसार तुम्ही रस्त्यात आंदोलन केलं तर तुम्हाला पाच ते सात वर्ष तुरुंगात ठेवलं जाणार होतं. साधी निदर्शनं केली तरी तुरुंगवास होणार होता. एका माणसाने असो की २५ लोकांनी आंदोलन केले तरी तुरुंगात टाकणार होते.
निदर्शने करण्याचा लोकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतला जाईल. पण विरोधी पक्ष जागरूक होता. म्हणून कायदा थांबला, असं यावेळी शरद पवार म्हणाले. राज्यातील युती सरकारपासून महाराष्ट्राची सुटका करणं हे आपल्या समोरचं आव्हान आहे, असं म्हणत शरद पवारांनी याही परिस्थितीला तोंड द्यायचं आहे असं कार्यकर्त्यांना धीर दिला. निवडणुकीला सामोरं जायचं आहे, एकजूटीने लढायचं आहे, सरकार बदलायचं आहे. आम्ही तिघेही खात्री देतो की, डावे, उजवे, मविआतील सर्व घटक पक्षांना सन्मानाने सोबत घेऊन निवडणुकीला एका विचारधारेने सामोरं जाऊ आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं काम एकजुटीने करू. या प्रयत्नात तुमचा हातभार हवा आहे, असं आवाहन पवार यांनी केलं.



