शनिवार, १७ ऑगस्ट | संगमनेर
श्रीरामपूरमधील तृतीयपंथी आयशा पिंकी शेख (वय ३० वर्ष, रा. डावखर रोड, वार्ड नंबर ६) हिने संगमनेरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, आयेशा शेख काही दिवसांपासून संगमनेरमधील जोर्वे रस्त्यावरील एकतानगरमध्ये रिया, कविता, प्रियांका, शंतनु यांच्यासोबत राहत होती. श्रीरामपूरहून आल्यापासून ती तणावामध्ये होती.
बुधवारी (दि. १४ ऑगस्ट) रात्री संगमनेर येथील वाबळे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे औषध उपचार घेऊन आल्यानंतर रिया व कविता व्यांच्यासोबत एकतानगरमधील घरी थांबली होती. दरम्यान रिया व कविता यांना काहीतरी आणण्यासाठी गावात पाठवले होते. गावातून आल्यानंतर त्यांनी दरवाजा बंद असल्याचे बघितले त्यानंतर त्यांनी खिडकीतून बघितले असता आयशाने गळफास घेतल्याचे लक्षात आले.
नंतर त्यांनी काही लोकांच्या मदतीने दरवाजा उघडून घरात गेल्यानंतर आयशा हिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक सुजाता थोरात करत आहेत.



