रविवार, १८ ऑगस्ट
काँग्रेसमध्ये निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची पक्षीय भूमिका बजावणारे संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवत काँग्रेसच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या (CWC) सदस्यपदी त्यांची फेरनिवड केली आहे. यामुळे थोरात यांच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा संगमनेरचे महत्व अधोरेखित झाले आहे.
काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे व खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे थोरात यांच्या निवडीची माहिती दिली.
स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा लाभलेले आमदार बाळासाहेब थोरात हे १९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी होत विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. चार दशके राजकारणात असलेल्या थोरात यांनी राष्ट्रीय समित्यांसह राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, जलसंधारण, रोहयो, खार जमीन, राजशिष्टाचार अशा आठ विभागांची जबाबदारी सांभाळताना या सर्व विभागांना लोकाभिमुख केले. महसूलमंत्री असताना ऑनलाईन सातबारा, आठ अ तसेच विद्यार्थ्यांना शाळेतच ८० लाख दाखले देण्याचा विक्रम केला होता. शिक्षणमंत्री काळात बेस्ट ऑफ फाईव्ह तर कृषी मंत्री काळात एक लाख शेततळ्यांची निर्मिती केली.
त्यांच्या कामाची दखल घेत २०१८ मध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर पक्षाने गुजरात निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठे यश मिळाले. यानंतर हिमाचल प्रदेशच्या निरीक्षकपदीही थोरात यांनी काम केले. २०१९ मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर त्यांची निवड झाली होती. तर जुलै २०१९ मध्ये पक्ष अत्यंत अडचणीत असताना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी ४४ आमदार निवडून आणले. याचबरोबर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये मोलाचा वाटा उचलला.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महसूलमंत्रीपद सांभाळताना ई – पीक पाहणीसह शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली. याच काळामध्ये निळवंडे कालव्यांना अत्यंत गती देताना कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाचे स्वप्न पूर्ण केले. राष्ट्रीय व राज्य पातळीवर काम करताना संगमनेर तालुका सर्वांगीण विकासातून राज्यात अग्रगण्य बनवला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळताना त्यांनी महाविकास आघाडीला ३१ जागांवर मोठे यश मिळवून दिले. शांत, संयमी, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून काँग्रेस पक्षामध्ये आमदार बाळासाहेब थोरातांची अत्यंत लोकप्रिय असून विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर राष्ट्रीय काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
काँग्रेसच्या सर्वोच्च असलेल्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार सोनिया गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, के. सी. वेणूगोपाल, पी. चिदंबरम अशा राष्ट्रीय नेत्यांचा समावेश असलेल्या कमिटीत आता थोरात पुन्हा काम पाहतील.



