प्रवीण पुरो | मुंबई
बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर राज्यभर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. बदलापूरच्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत असताना तीन पक्षांच्या युती सरकारच्या काळात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचं वास्तव पुढे आलं आहे.
बदलापूरमध्ये एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटताहेत. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही असं उघडपणे बोललं जातं. आजवरच्या अशा घटना भाजपाशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग असल्याने गुन्हे दाखल करताना पोलीस आखडतं घेत असल्याच्या तक्रारी केल्या जातं होत्या.

नराधमांना कायद्याची भीती नसल्यामुळं, ते असं राक्षसी कृत्य करण्यास धजावत आहेत, असं संतप्त नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैगिंक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र आहे. अशा घटना घडल्यानंतर यामध्ये राजकीय हस्तक्षेपही होताना दिसत आहे.
बदलापुरातील अत्याचाराची घटना ताजी असताना आता अकोल्याच्या शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापजनक म्हणजे एका विकृत शिक्षकानं शाळकरी मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांचं लैंगिक शोषण केलं. विचित्र पद्धतीनं शिक्षक मुलींना स्पर्श करायचा, असा त्याच्यावर आरोप आहे. आरोपी शिक्षकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
सिन्नर तालुक्यात फक्त साडेचार वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. घरासमोर खेळत असताना आरोपीने तिचं अपहरण केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पोस्को अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही महिन्यापूर्वी आळंदीत एका १२ वर्षीय मुलावर एकाने अनैसगिक लैंगिक अत्याचार केले. आरोपी हा अनाथ मुलांच्या निवासी संस्थेतील कर्मचारी होता. काही दिवसांनी त्या आरोपीला अटक केली. आरोपी हा मुलास मोबाईल पाहायला देऊन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला तसंच अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषणाच्या घटनेमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिकांना पडला आहे. पोलिसांना वरिष्ठांचे आदेश आले, की त्यांनाही शांत बसावं लागतं. राजकीय हस्तक्षेपामुळं खाकी वर्दीला आपला दंडुका खाली घ्यावा लागतोय. यामुळं गुन्हेगार मोकाट सुटलेत. परिणामी अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होतेय, अशीही जनसामान्यांची भावना आहे.
दरम्यान गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात अल्पवयीन मुलांवर झालेल्या अत्याचारांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचं स्पष्ट झालं आहे. २०२० मध्ये अशा प्रकारच्या १७८५ गुन्ह्यांची नोंद झाली. त्याच्या दुसऱ्याच वर्षी हा आकडा ३४५८ झाला. २०२२ मध्ये असे ४१८० गुन्हे नोंदवले गेले. २०२३ मध्ये असे ४४४९ गुन्हे घडल्याचेही एकूणच परिस्थिती वरून सांगण्यात आलं.

दिवसाढवळ्या मुलींची छेडछाड काढली जाते. महिला, शाळकरी मुलींवर अत्याचार, बलात्कार केले जाताहेत. पण अशा घटना रोखण्यास सरकार, गृहखातं अपयशी ठरलंय. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. कायद्याची वचक नसल्यामुळं, असे प्रकार घडताहेत. असं कृत्य केल्यानं थोडीफार शिक्षा होईल, असं आरोपींना माहितीय. परिणामी त्यांना कायद्याचा जरब, भीती नसल्यामुळं समाजात असा वारंवार घटना घडताहेत, अशी प्रतिक्रिया बदलापूरातील रहिवासी निशा माने यांनी दिली.

