शुक्रवार, २३ ऑगस्ट
नाशिक रोड जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी म्हाळुंगी नदीपात्रात लिकेज झाल्याने या जल कुंभावरून उपनगरात होणारा पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्यात येणार असल्याची माहिती संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली आहे.

धरणाच्या लाभक्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यातच भोजापूर धरण भरल्यामुळे म्हाळुंगी नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शहरातून वाहणाऱ्या म्हाळुंगी नदीला मंगळवारी पूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे नाशिकरोड जलकुंभाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी म्हाळुंगी नदीपात्रात लिकेज झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला आहे.
संगमनेरकर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपरिषदेने या जलकुंभाला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. लिकेज झालेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून म्हाळुंगी नदीला असलेल्या पाण्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीच्या कामास विलंब होत आहे.
या जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण होताच या जलवाहिनीतून उपनगराला दैनंदिन होणारा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. या जलकुंभावरून शहरातील उपनगरात सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळेस विभागून पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये गणेश नगर, मोती नगर, सत्संग नगर, मालदाड रोड भागातील सर्व कॉलनी, सौभाग्य मंगल कार्यालय, गिरीराज नगर, त्रिमूर्ती चौक आदी परिसरात करण्यात येणारा पाणीपुरवठा जलवाहिनीची दुरुस्ती होईपर्यंत उद्या शनिवारपासून (२४ ऑगस्ट) एक दिवसाआड व संध्याकाळचा पाणीपुरवठा देखील सकाळच्याच वेळेत करण्यात येणार आहे.

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करत अपव्यय टाळण्याचे तसेच नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.

