मुंबई, विशेष प्रतिनिधी
राज्य शासनाने आज प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या नव्या नियुक्त्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयापासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
या फेरबदलात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली असून, देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या त्या नवीन प्रमुख असतील.
याचसोबत कृषी आणि पदुम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा) म्हणून बदली करण्यात आली आहे.
महसूल व वन विभागातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांच्याकडे आता मृद व जलसंधारण विभागाची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची वर्णी लागली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेले तुकाराम मुंढे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कामकाज पाहतील.
तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांची पदोन्नतीने कृषी विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये मणिक गुरसाळ यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी, तर लाहू माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादितच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. राज्य कर विभागाच्या सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्यव्यवसाय आयुक्त म्हणून बदली झाली असून, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी झालेल्या या मोठ्या फेरबदलांमुळे मंत्रालयातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.





