सोमवार, २५ ऑगस्ट
अहमदनगर – मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या दोन्ही योजनांचा जिल्ह्यातील ज्येष्ठांना लाभ देण्यासाठी ६ लक्ष लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकजुटीने व गतीने काम करावे. तसेच योजनेचे फॉर्म भरुन घेण्यासाठी येत्या शनिवारी व रविवारी जिल्ह्यात विशेष कँपचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या आढाव्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्यासह सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, क्षेत्रफळाने व लोक संख्येच्यादृष्टीने आपला जिल्हा मोठा आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यासाठी मोठा वाव आहे. या दोन्ही योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी ६ लक्ष लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असुन या योजनेचा शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका कार्यालयामध्ये योजना कक्ष सुरु करण्यात यावा. या कक्षातुन लाभार्थ्यांना योजनेची माहिती देण्याबरोबरच त्यांचे लाभासाठीचे फॉर्म भरुन घेण्यात यावेत.
मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची माहिती जिल्ह्यातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी या दोन्ही योजनांची शहरी व ग्रामीण पातळीवर व्यापक स्वरुपात जागृती करा. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये योजनेची माहिती असलेले बॅनर, पोस्टर लावण्यात यावेत. गत शनिवार व रविवारी झालेल्या विशेष कँपमध्ये सर्वच अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये आजपर्यंत १ लक्ष ३२ हजार ३४२ लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले असुन मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये २ हजार ८०६ अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. परंतू यापेक्षाही अधिक चांगले व अधिक गतीने काम करण्याची गरज असुन अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कृषी सहायक या तालुका व ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्या घटकांची मदत घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी केल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर म्हणाले, जिल्ह्यात दोन दिवसीय शिबीरामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे चांगले काम झाले आहे. परंतू एवढ्यावर समाधानी न राहता आपला जिल्हा या योजनांच्या अंमबजावणीमध्ये राज्यात अग्रेसर राहील यादृष्टीने काम करा. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित व समन्वयाने काम करत या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात यावा.


