बुधवार, २८ ऑगस्ट
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला उच्चांकी ७१०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. तर कांद्याला ४१०१ रुपयापर्यंत भाव मिळाला. यामुळे डाळिंब आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ आणि अध्यक्ष शंकरराव खेमनर यांनी म्हटले आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डमध्ये मंगळवारी (२७ ऑगस्ट) डाळिंबाला चांगला भाव मिळाला. एक नंबर डाळिंबास २५१ ते ३५० रुपये प्रति किलो, दोन नंबर डाळिंबास १५१ ते २०० रुपये प्रति किलो, तीन नंबर डाळिंबास ८० ते १०० रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळाला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५२८१ कांदा गोण्यांची आवक झाली असून सुरुवातीच्या सुपर गोळा मालाला ४१०१ रुपयांपर्यंत भाव मिळाला असून एक नंबर कांद्यास ३९०० ते ४००० रुपये, दोन नंबर कांद्यास ३५०० ते ३८५१ रुपये, तीन नंबर कांद्यास २९५१ ते ३४५१ रुपयांपर्यंत, गोल्टी कांद्याला २३०० ते २९०० रुपयांचा तर चार नंबर कांद्यास दीड ते अडीच हजार रुपये भाव मिळाला आहे.
वडगाव पान संगमनेर येथे सुरू केलेल्या उपबाजार समितीमध्ये न्यूज कांद्याचे आवक मोठ्या प्रमाणात होत असते. मंगळवारी आवक झालेल्या कांद्याला ३७०० रुपयांपासून ते ३८०० रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे. येथे शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या वाहनामध्ये लुज कांदा विक्रीसाठी घेवुन येत असतात. सदर ठिकाणी शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने वजनकाट्याची व्यवस्था केलेली असुन जाहीर लिलावाद्वारे लुज कांदा विक्री केली जाते. तसेच टोमँटो या शेतमालास प्रति क्रेटस १०० ते ३७५ रुपयापर्यंत भाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, आपला लुज कांदा शेतमाल हा योग्य प्रतवारी करुन उपबाजार वडगावपान येथे तसेच गोणीमधील कांदा तसेच डाळींब, टोमँटो हा शेतमाल देखील योग्य प्रतवारी करुन बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डात विक्रीसाठी घेवुन यावा, जेणेकरुन विक्रीसाठी आणलेल्या शेतमालास उच्च प्रतीचा बाजारभाव मिळेल. – शंकरराव खेमनर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.


