बेजबाबदार शासनाला जनतेने शिक्षा द्यावी – माजी आमदार डॉ. तांबे
मालवणची घटना दुर्दैवी व वेदनादायी – डॉ. जयश्री थोरात
बुधवार, २८ ऑगस्ट
संगमनेर – महाराष्ट्रासह देशवासीयांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरील पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने राज्यभरात भ्रष्ट सरकार विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. बुधवारी संगमनेरमध्ये देखील महाविकास आघाडीच्यावतीने निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकार्यांना या संदर्भातील निवेदन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
संगमनेरकर नागरिक, शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमलेले सर्वजण भ्रष्ट भाजप सरकार विरोधात घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयात आले होते.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री व गजेंद्र अभंग, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहर प्रमुख गोविंद नागरे, पथविक्रेता समितीचे दीपक साळुंखे, अमोल डुकरे, रंगनाथ फटांगरे, राष्ट्रवादीचे बी. जी. देशमुख, अर्चना बालोडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
- अत्यंत बेपर्वाही असलेले हे सरकार बेताल वक्तव्य करत आहेत…
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचा पुतळा कोसळणे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी आणि संताप जनक आहे. असे असताना शासन मात्र ही जबाबदारी एकमेकांवर ढकलाढकली करत आहेत. अत्यंत बेपर्वाही असलेले हे सरकार बेताल वक्तव्य करत आहेत. जनतेने या सरकारला कडक शिक्षा दिली पाहिजे. शिक्षणमंत्री सुद्धा या संवेदनशील विषयावर बेजबाबदार वक्तव्य करतात, हे अत्यंत चिंताजनक असून या महाराष्ट्र सरकारचा आपण निषेध करत आहोत. – डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार
- सरकारने नौदलावर जबाबदारी ढकलने दुर्दैवी, महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना महाराष्ट्रासाठी वेदनादायी…
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळणे या अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. खरे तर महाराजांनी उभारलेले गड किल्ले हे चारशे वर्षापासून तसेच आहेत आणि या भ्रष्टाचारी सरकारने उभारलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे. यामधील ठेकेदार आणि भ्रष्टाचारांना कडक शिक्षा झाली पाहिजे याचबरोबर या सरकारने या घटनेची जबाबदारी घेतली पाहिजे. दुर्दैवाने राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा नौदलावर या घटनेची जबाबदारी ढकलतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. नौदल हे सागरी किनाऱ्याचे रक्षण करते मात्र त्यांच्यावर आरोप करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे चुकीचे आहे. सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. – डॉ. जयश्री थोरात.
- राज्यातील जनतेत संताप…
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानकपणे कोसळणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान देखील आहे. या घटनेमुळे शिवप्रेमी मध्ये संताप निर्माण झाला आहे. घटनेची जबाबदारी सरकार नौदलावर ढकलत आहे. या प्रकाराचा निषेध करत राज्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकारने दक्षता घेण्याची गरज आहे. – साथी विनायक माळवे, प्रदेश सचिव जनता दल (सेक्युलर)


