शनिवार, ३१ ऑगस्ट
“महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या कालावधीत निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत, तसंच पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केल्यानेही या चर्चेने आणखी वेग पकडला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र महाविकास आघाडीने निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. आमच्या १७५ ते १८० जागा निवडून येतील असं महाविकास आघाडीने म्हटलं आहे. तर दुसरीकडे महायुतीनेही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.
“मालवण पुतळा प्रकरण, बदलापूरची घटना यामुळे जनतेला सरकारविषयी प्रचंड रोष आहे. पुतळ्यावरून तर राज्यभर संतप्त भावना उमटत आहेत. गेल्या शंभर वर्षांत देशात कधी पुतळा पडला नाही. त्यामुळे जगभरातही उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. केंद्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाविकास आघाडीला जवळपास १८० च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची. यानंतर काही काळ गेल्यानंतर तसेच वातावरण शांत झाल्यानंतर निवडणुकांना सामोरे जायचे”, अशा हालचाली सध्या सुरु असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली.



