महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा महोत्सव
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर
संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये विकृत मानसिकता वाढली आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज महिला, चिमुकल्या सुरक्षित नाही. महिलांवरील अत्याचार वाढले असून बदलापूर घटनेनंतर पोलीस पीडीतेचा एफआयआरदेखील दाखल करून घेत नव्हते. दिल्लीत कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाची कोणी दखल घेत नाहीत अशा परिस्थितीत भ्रष्टाचार देखील वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेला होता भ्रष्टाचाराच प्रतीक असल्याचा खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटल आहे.
संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर एकविरा फाउंडेशन आणि अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून पंधरा हजार महिलांच्या उपस्थितीत आयोजित ‘इंदिरा महोत्सव’ शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, महोत्सवाच्या आयोजक कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, शरयू देशमुख, प्रभावती घोगरे, लिज्जत पापडचे सुरेश कोते, कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे, व्याख्याते गणेश शिंदे, केशव कांबळे, वंदना पाटील, मनीषा कटके, शरद नानापुरे, कुणाल दुसाने, अमित मनोरे, सतीश दवंगे, भावना बच्छाव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिंदे म्हणाल्या, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका समृद्ध असून येथे महिलांना सन्मान मिळतो आहे. महिलांच्या स्वयंरोजगारासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतील इंदिरा महोत्सव हे मोठे व्यासपीठ ठरणार असून महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा हा महोत्सव आहे.
काँग्रेसने महिलांना आरक्षण दिले त्यामुळे महिलांना सर्व क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत आहे. तालुक्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करून देण्याचे काम डॉ. जयश्री थोरात यांनी केले. या तालुक्यातील कामांच्या आदर्श इतरांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या.
मुंबईतून दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाविषयी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, पंतप्रधान राजीव गांधी यांनी महिला आरक्षण दिले. त्यातून महिलांना अनेक संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला भगिनी काम करत असून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक मदत व्हावी यासाठी रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची ही सुरुवात आहे. संगमनेर देशासाठी देशावरचे ठरेल याकरिता आपण सर्वजण काम करूया. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, सुरेश कोते यांनीदेखील यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, दुग्ध व्यवसायात या तालुक्यातील महिलांचे मोठे योगदान आहे. तालुक्यातील प्रत्येक कष्टकरी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी आपण काम करत असून गृह उद्योग, रोजगार, प्रशिक्षण याशिवाय महिलांचे आरोग्य याकरिता इंदिरा महोत्सवातून दोन दिवस विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
असे आहे इंदिरा महोत्सवाचे स्वरूप…
महोत्सवात सहभागी झालेल्या महिलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या ५१ कंपन्या या महोत्सवात सहभागी झाल्या असून त्यांनी अनेक महिलांना रोजगारासाठी करारबद्ध केले आहे. याशिवाय पॅनल डिस्कशनमधून रोजगार, स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन, विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहून महिलांना कर्ज प्रकरणाबाबत मार्गदर्शन करत आहे. पंधरा हजार महिलांच्या सहभाग हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे.




