महोत्सव बचत गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी व्यासपीठ निर्माण करणारा
दोन दिवसात ३५ हजार महिलांचा सहभाग
बुधवार, दि. ०४ सप्टेंबर
इंदिरा महोत्सवातून अनेक महिलांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे. बचत गटाच्या महिलांना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्या कुटुंबाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हा प्रयत्न आहे. बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित मालाच्या मार्केटिंगसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जगाच्या पाठीवर पोहोचता येईल. यासाठी इंदिरा महोत्सव मानबिंदू ठरेल, असा आशावाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
संगमनेरमध्ये आयोजित इंदिरा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात थोरात बोलत होते. धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, प्रभावती घोगरे, पौर्णिमा शिरसकर, केशवराव कांबळे, इंद्रजीत थोरात, सह्याद्री उद्योग समूहाचे विलास शिंदे, सत्यजित हंगे, संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, संपतराव म्हस्के, घनश्याम शेलार, शरयू देशमुख, जगन्नाथ घुगरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
थोरात म्हणाले, राजीव गांधींनी महिला आरक्षण विधेयक आणले, त्यातून ३३% आरक्षण महिलांना मिळाले. राज्यात काँग्रेसने महिलांना ५० टक्के आरक्षण दिले, त्यामुळे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाले. शासकीय योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा.
घराचा उंबरठा ओलांडून जगात येण्याची तयारी ठेवा. तुमच्या उद्योग व्यवसायाला एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून नक्कीच मदत केली जाईल. संगमनेर तालुक्यात बचत गटांचे मोठे जाळे असून गटातील महिलांनी आपल्या उत्पादनाचे चांगले मार्केटिंग केले तर त्या माध्यमातून कुटुंबाला देखील मोठा आर्थिक फायदा होईल. गरीब महिलांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे, यासाठी आपण सर्वजण काम करत आहोत.
यावेळी प्रभावती घोगरे, विलास शिंदे, सत्यजित हंगे, दुर्गाताई तांबे, पौर्णिमा शिरसकर, डॉ. जयश्री थोरात यांनी देखील महिलांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जयश्री थोरात यांनी, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर अर्चना बालोडे यांनी आभार मानले.



