शनिवार, ०५ ऑक्टोबर
मुंबई – राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामासाठीच्या अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ४ लाख १२ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या अनुदानाचे १२९ कोटी ४३ लाख २५ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे.
अनुदान वितरणाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. राज्यभरात पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ९६ लाख ७८७ इतकी आहे.
निकषानुसार पात्र असणाऱ्या नगर जिल्ह्यातील ५ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी ४ लाख १२ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यावर १२९ कोटी ४३ लाख २५ हजारांची मदत वर्ग झाली आहे. उर्वरित शिल्लक शेतकऱ्याच्या खात्यावरही मदत लवकरच वर्ग होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात कापूस पिकासाठी पहिल्या टप्प्यात १ लाख ७४ हजार १५२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५४ कोटी ७५ लाख ५६ हजार, तर सोयाबीन पिकासाठी २ लाख ३८ हजार २१९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ७४ कोटी ६७ लाखांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. सण – उत्सवाच्या काळात शासनाकडून मदत प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तालुका निहाय अनुदानाचे स्वरूप…
अहमदनगर – २१ हजार ५६४ शेतकऱ्यांना ७ कोटी ९ लाख १३ हजार, पारनेर – २८ हजार ३० शेतकऱ्यांना ७ कोटी ३२ लाख २२ हजार, पाथर्डी – ४० हजार ९२८ शेतकऱ्यांना ११ कोटी ५ लाख ३१ हजार, कर्जत – ९ हजार १३८ शेतकऱ्यांना २ कोटी ६० लाख ७२ हजार, जामखेड – २५ हजार ३६९ शेतकऱ्यांना ६ कोटी ९९ लाख ९६ हजार, श्रीगोंदा – १९ हजार ४२९ शेतकऱ्यांना ५ कोटी ९२ लाख ७५ हजार, श्रीरामपूर – २२ हजार ६६५ शेतकऱ्यांना ८ कोटी ५३ लाख ९५ हजार, राहुरी – ३३ हजार १ शेतकऱ्यांना १० कोटी ७५ लाख ४६ हजार, नेवासा – ५२ लाख ४५६ शेतकऱ्यांना १९ कोटी १ लाख ६९ हजार, शेवगाव – ३७ हजार ६ शेतकऱ्यांना १२ कोटी ३४ लाख ३५ हजार, संगमनेर – ३६ हजार ७८१ शेतकऱ्यांना १० कोटी ३६ लाख ३६ हजार, कोपरगाव – २२ हजार ८६७ शेतकऱ्यांना ५ कोटी ३८ लाख १७ हजार, अकोले – २२ हजार ८६७ शेतकऱ्यांना ५ कोटी ३८ लाख १७ हजार आणि राहाता – २९ हजार ९६९ शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचे मिळून १० कोटी २१ लाख ८१ हजार अनुदान वितरित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक शेतकरी मदतीसाठी पात्र आहेत. केवायसी पूर्ण करण्यात आलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरदेखील अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल. – सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.


