रविवार, ०६ ऑक्टोबर
मुंबई : चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग लागण्यामागील नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे मंजू प्रेम गुप्ता (३० वर्षे), अनिता गुप्ता (३९ वर्षे), प्रेम गुप्ता (३० वर्षे), परीस गुप्ता (७ वर्षे), नरेंद्र गुप्ता (१० वर्षे) अशी आहेत.
समोर आलेली माहिती अशी की, रविवारी पहाटेच्या सुमारास चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून यात ७ वर्षांच्या आणि १० वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. पहाटे साडे चारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्यांना घाटकोपरमधील राजवाडी रुग्णालयात दाखल केलंय.
आग लागली तेव्हा घरात सर्वजण झोपले होते. आग इतकी वेगात भडकली की घरातल्या लोकांना बाहेर पडता आलं नाही. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य सुरू केलं पण आगीने रौद्ररुप धारण केलं होतं. जखमी अवस्थेत कुटुंबातील लोकांना बाहेर काढलं पण रुग्णालयात नेत असताना त्यातील काही जणांचा मृत्यू झाला.





