सोमवार, ०७ ऑक्टोबर
असुरक्षित बनलेल्या संगमनेरमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्याची मालिका नव्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळात अद्यापही सुरूच आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविल्यानंतर शनिवारीदेखील एसटी बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड लाखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे.
त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात दागिने घालून घराबाहेर पडणाऱ्या महिला असुरक्षित बनल्या असून दागिने चोरांना लगाम घालण्यात संगमनेर शहर पोलीस यशस्वी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात दिवसा आणि रात्री पोलिसांनी गस्त वाढविण्याची, सतर्क राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
निर्मला जयराम आंबरे (वय ७१ वर्ष रा. शिवाजी चौक, अकोले, ता. अकोले जि. अहमदनगर) या वृद्ध महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरात्र उत्सव काळातील हा दुसरा प्रकार समोर आला आहे. 
निर्मला आंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी (५ ऑक्टोंबर) त्या राजापूर (संगमनेर) येथे चुलत भावाच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी परतण्यापूर्वी त्यांनी आपल्या गळ्यातील सुनेच्या मालकीचे असलेले सोन्याचे गंठण आपल्या जवळील पर्समध्ये ठेवले होते.
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या अकोले येथे जाण्यासाठी त्या बस स्थानकावर आल्या असता त्यांनी पर्सची तपासणी केली त्यावेळी पर्समध्ये सोन्याचे गंठण होते.
त्यानंतर संगमनेर बस स्थानकात एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांना धक्का दिला. बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी तिकीट काढण्यासाठी पर्स उचकून बघितली असता त्यांच्या पर्समधील सात तोळे सोन्याचे मिनी गंठण आणि चारशे रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला असल्याचे त्यांना आढळून आले. दागिने आणि रोकड लंपास केल्याचा प्रकार लक्षात येतात आंबरे यांनी आरडाओरड केली मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. तोपर्यंत चोरटे दागिने घेऊन पसार झाले होते.

दरम्यान या प्रकारामुळे घाबरलेल्या आंबरे यांनी घर गाठत झालेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली. पोलीस हवालदार गणेश सोनवणे या संदर्भात पुढील तपास करत आहे.

