बुधवार, ०९ ऑक्टोंबर
नुकतेच अहमदनगर शहराचे नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात आले होते. या संबंधीच्या बदलाला केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता महसूल विभागाने तालुक्याच्या नावासह जिल्ह्याच्या नावात देखील बदल केला आहे. मंगळवारी या संदर्भातील राजपत्र प्रसिद्ध झाले. त्यामुळे आता काना मात्रा वेलांटी नसलेल्या शहराची आणि जिल्ह्याची ओळख राज्यात अहिल्यानगर या नव्या नावाने होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर शहर आणि जिल्ह्याच्या नावात बदल करण्याचे सुतोवाच राज्यकर्त्यांनी केले होते. अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर अथवा अंबिकानगर अशा स्वरूपाचे नाव देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. अखेरीस अहमदनगरला अहिल्यानगर असे नाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
त्यानंतर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने १ ऑक्टोंबरला दिलेल्या अनुमतीनंतर राज्य सरकारने ४ ऑक्टोंबरच्या राजपत्रात नगर शहराच्या नावात अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असा बदल केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शासनाने नव्याने मंगळवारी काढलेल्या राजपत्रात शहराच्या नावात अहमदनगर जिल्हा ऐवजी आहिल्यानगर, उपविभागाच्या नावात अहमदनगर उपविभागाऐवजी अहिल्यानगर उपविभाग, अहमदनगर तालुक्याच्या नावात अहिल्यानगर तालुका व अहमदनगर शहराच्या नावात अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असा बदल केला असल्याचे महसूल व वन विभागाने म्हटले आहे. 

यामुळे आता काना मात्रा वेलांटी उकार नसलेल्या राज्यातील या शहर व जिल्ह्याची ओळख पूर्णतः बदलली असून आता अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर या नव्या नावाने सर्वत्र ओळखला जाणार आहे.

