शनिवार १२ ऑक्टोंबर
मका तोडण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर अचानकपणे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ३५ वर्षीय महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी ऐन दसऱ्याच्या दिवशी शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलनस्थळी पोहोचलेल्या थोरात यांनी तात्काळ राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन करत नरभक्षक बिबट्याला मारण्यासंदर्भात मागणी करत वन विभागाचा हलगर्जीपणा विषद केला. मुनगंटीवार यांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लगेचच नरभक्षक बिबट्याला तात्काळ करण्याचे आदेश देत नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश देत असल्याचे थोरात यांच्यासह आंदोलकांना सांगितले.


दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये मानेवर व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने योगिता पानसरे या महिलेचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू होण्याची ही या परिसरातील दुसरी घटना असल्याने देवगावसह लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अपयश आले असल्याने नागरिक संतप्त झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना या परिसरात वारंवार समोर आल्या आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून लोक तक्रारी सांगतात, परंतु वनविभागाचे अधिकारी नागरिकांचे फोन देखील घेत नाहीत. जिथून तक्रार येते त्या परिसरात पिंजरा लावून वन कर्मचारी गायब होतात. त्यामुळे आता दाद मागावी कोणाकडे असा प्रश्न लोकांपुढे पडला आहे. त्यातच दसरा सणाच्या पूर्वसंध्येला काल संध्याकाळी योगिता पानसरे यांना बिबट्याने ठार केल्याने परिसरातील लोक संतप्त झाले. त्यामुळेच आज दसरा सण असूनही या गावातील चार-पाच हजार लोकांचा जमाव रस्त्यावर उतरला.
या आंदोलनात उत्स्फूर्तपणे लोक, विशेषतः महिला आपली गाऱ्हाणी मांडत होत्या. बिबट्या महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची याचा विचार आता सरकारने केला पाहिजे. सरकारला जर बिबटे महत्त्वाचे वाटत असतील तर आम्हा माणसांना मारून टाका. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यानंतर सरकार नुकसान भरपाई म्हणून पैसे देते, परंतु आम्हाला पैसे नको, तर सुरक्षा द्या अथवा माणसांसाठीच एखादे अभयारण्य निर्माण करा अशा संतप्त भावना यावेळी लोकांनी व्यक्त केल्या.

संतप्त झालेल्या लोकांच्या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार बाळासाहेब थोरात हे तात्काळ आंदोलनस्थळी गेले. लोकांच्या तीव्र भावना ऐकून घेतल्यानंतर त्यांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला. दोघांमध्ये संभाषण फोनचा स्पीकर ऑन करत सर्व लोकांना ऐकविण्यात आले. वनमंत्र्यांशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, आज दसरा सण असूनही चार-पाच हजार लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या भावना अत्यंत संतप्त आहेत. तो बिबट्या नरभक्षक झाला असून त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत.
अजूनही किमान पंधरा-वीस बिबटे या परिसरात आहेत, त्यांचाही बंदोबस्त केला पाहिजे. वनविभागाचे लोक पिंजरे लावतात परंतु त्यात बिबटे अडकत नाहीत. वनखात्याचे अधिकारी जनतेचे फोन घेत नाहीत, मग लोकांनी तक्रार कोणाकडे करायची ? असा सवाल आमदार थोरात यांनी मुनगंटीवार यांना केला. याशिवाय लोकांच्या तक्रारी ऐकून न घेणाऱ्या वनविभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.
थोरात यांच्या फोनची दखल घेत मंत्री मुनगुंटीवार म्हणाले, “आज सणाची सुट्टी असली तरी त्या नरभक्षक बिबट्याला तात्काळ ठार मारण्याचे आदेश आपण देत आहोत. त्या परिसरात असलेले उर्वरित बिबटे पकडण्यासाठी जनतेने सहकार्य करावे आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लगोलग तेथे जाऊन परिसरातील सर्व बिबट्यांना पकडण्याची कार्यवाही करावी असेही आदेश आपण देत आहोत.” वनमंत्र्यांच्या या आदेशानंतरही लोकभावना तीव्र होत्या. मात्र थोरात यांनी समजूत घातल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.

