शनिवार, १२ ऑक्टोंबर
१९८५ च्या निवडणुकीने संगमनेर तालुक्यात नव्या इतिहासाला सुरुवात झाली. तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली. सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका राज्यातील प्रगतशील तालुका बनला असून आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण इकडे येतील निवडणुकीमुळे मन्या दूषित करण्याचा प्रयत्न करतील परंतु अशांना वेळच रोखत राजकारणाचे चांगली संस्कृती आणि परंपरा पुढे नेण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
थोरात यांच्या हस्ते शनिवारी संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या ऐतिहासिक शाळा गडावर विजयादशमीच्या दिवशी पारंपारिक वाद्य, सनई चौघडे, ढोल ताशांच्या गजरात, सूर आणि संबळच्या साथीने भारावून टाकणाऱ्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकाबरोबर संगमनेर तालुक्यातील गावा-गावातील तरुण-तरुणींशी संवाद साधण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसने ही संवाद यात्रा काढली आहे.
गडावर देवीची आरती केल्यानंतर तिरंगा ध्वज आमदार बाळासाहेब थोरात व मान्यवरांच्या उपस्थितीत युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्याकडे सोपविण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेस शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी नगरसेवक शैलेश कलंत्री आदींसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
१२ दिवसात करणार ५०० किलोमीटरचा प्रवास…
डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील १७१ गावे व २५८ वाड्यावस्त्यांवर जाऊन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी १२ दिवसात ५०० किलोमीटरचा प्रवास करत येथील सुसंस्कृत राजकारणाबरोबर समृद्ध परंपरा स्पष्ट करत युवक, नागरिक, महिलांसोबत संवाद साधणार आहे.

तालुका खबऱ्यांचा बंदोबस्त करेल – जयश्री थोरात
संवाद यात्रेच्या माध्यमातून बारा दिवस चालणाऱ्या या यात्रेत वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांशी संवाद साधला जाणार आहे. ही यात्रा स्वाभिमानासाठी आहे. संगमनेर तालुक्यातील डोंगरदऱ्या, नदी परिसर, पठार भाग, दुष्काळी पट्टा अशी भौगोलिक परिस्थिती लाभलेल्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यात संवाद यात्रा जाणार असून संगमनेर तालुक्यातील चांगल्या राजकारणाची संस्कृती आणि स्वाभिमान प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करेल. युवा पिढीच्या माध्यमातून तालुक्यातील खबऱ्यांचा देखील बंदोबस्त केला जाईल.

संविधान धोक्यात – डॉ. सुधीर तांबे
सध्या संविधान धोक्यात आहे. चांगला भारत घडविण्यासाठी तरुणांनी एकत्र आले पाहिजे. स्वतःमधील क्षमता ओळखायला शिका. आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यात सभ्यता, प्रेम, बंधूभावाची संस्कृती निर्माण केली असून ती जपण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याची आवश्यकता आहे.


