शनिवार, १२ ऑक्टोंबर
अनेक अडचणींवर मात करत आपण निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण केली. प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन केले, त्यासाठी स्वतःची जमीन दिली. मात्र शेजारच्यांनी गुंठाभरही जमीन दिली नाही. आपल्याला नाव ठेवणाऱ्यांचे निळवंडे साठी कवडीचेही योगदान नसल्याचे स्पष्ट करत निळवंडेचे काम कोणी केले हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

थोरात तळेगाव दिघे येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.
थोरात म्हणाले, निळवंडे धरणाचे पाणी खालच्याला द्यायचे तसे वरच्या नाही द्यायचे ही आपली भूमिका आहे. मध्यप्रदेश मधील हरिपुरासारखा पॅटर्न राबविण्याचा आपला प्रयत्न असून बोल घेवड्यांच्या मागे न राहता काम करणाऱ्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. गेल्या दोन वर्षापासून आपल्याकडे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून सत्ता आणि पैशाचा काहींना गर्व आणि अहंकार झाला आहे. तो उतरविण्याचे काम आपण केले.

चांगले काय आणि वाईट काय हे आपण ठरविले पाहिजे. यापुढील काळात आपल्याला तालुक्याचे संस्कृती जपण्याचे काम करावे लागेल. चांगले राजकारण करणाऱ्यांच्या पाठीशी आपण खंबीर उभे राहिले पाहिजे. या परिसरातून गेलेल्या भोजापुर चाळीसाठी ज्यांचे काहीही योगदान नाही, ते येथे येऊन भाषणे ठोकत आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा बनवाबनवीचा कार्यक्रम सुरू आहे, असे देखील टीका थोरात यांनी यावेळी केली.



