रविवार, १३ ऑक्टोंबर
जे मनाला येईल ते सांगितले जाते. शब्द दिले जात आहे. फुकट पैसे दिले जात आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष पैसे वाटतील. कारण ते तुमचेच पैसे आहे. इथूनच लुटलेले पैसे आहेत, ते पैसे नक्की घ्या, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना मते द्या. महाराष्ट्राची धुरा माझ्या हातात आली की हा महाराष्ट्र दिल्लीसमोर झूकणार नाही आणि तुटणार नाही. आपला अभिमान, स्वाभिमान आपणच जगावला पाहिजे. निवडणुकीनंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच विरोधी पक्षांवर टीका केली आहे.
रविवारी ठाकरे गोरेगाव येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले.
ठाकरे यांच्या मेळाव्यानंतर राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे राज्यात आता तिरंगी अथवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांमध्ये लढती होण्याची चिन्हे आहे.

ठाकरे विविध विषयावर भाष्य करताना म्हणाले, सुसंस्कृत महाराष्ट्र. देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणायचा. आज या महाराष्ट्राची ही दिशा? याला दशा म्हणतात. राजकीय पुढारी लोक निवडणुकीच्या तोंडावर काय वाटेल ते करतील. तुम्हाला जातीमध्ये बुडवतील. अजून कोणत्या गोष्टीत अडकवतील, पैशाचा महापूर आणतील. तुम्ही हे पैसे घ्या आणि मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्या.
सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, येत्या काही दिवसात आचारसंहिता लागेल. महाराष्ट्राकडे तुमचे, प्रत्येक मनसैनिकाचं लक्ष असलच पाहिजे. कुठे काय घडतय जनतेला कशाप्रकारे फसवलं जाते ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे.
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत ना युती, ना आघाडी आपण स्वतंत्रपणे राज्यात निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. निवडणूक निकालानंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ज्या लोकांनी अपेक्षा ठेवले आहे त्यांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तुम्हाला गृहीत धरलय. माझ्या हातात सत्ता द्या प्रत्येकाच्या हाताला काम असेल पण ते जातीप्रमाणे दिले जाणार नाही. मराठा समाजाला हव असलेले आरक्षण मिळू शकत नाही. ही गोष्ट होऊ शकत नाही. हे प्रत्येकाला माहित आहे. फक्त खरं बोलण्याचा धाडस राज ठाकरे करतो असे देखील स्पष्टपणे म्हणाले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तुम्हाला आज लिहून देतो, लाडकी बहीण योजनेचे या महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील. नंतर पैसे येणार नाही. जानेवारी, फेब्रुवारीत राज्याकडे पगार द्यायला पैसे नसतील.
राज्यात योजना काढून फुकट कसले पैसे देताय? बेरोजगारांना फुकट पैसे, शेतकऱ्यांना फुकट वीज, शेतकरी कुठे मागतोय, तो म्हणतो विजेत सातत्य असू द्या, कमी पैशात द्या. राज्यात कोणी काही मागत नाही यांना फुकट द्यायच्या सवयी लावायच्या आहेत. एकदा सवय लावली तर इतर राजकीय पक्ष तेच करतील. राज्य म्हणून काय विचार करणार आहात की नाही असा थेट सवालही त्यांनी केला.


