सोमवार, १४ ऑक्टोंबर
विधानसभा निवडणूक आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठका घेत धडाका लावला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत येणाऱ्या हलक्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे म्हणत दगाफटका करून सत्ता बळकवली तेव्हा शहाणपण का सुचले नाही? असा प्रश्न उपस्थित करत विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे पडक्या भिंतीला पुट्टी लावण्याचा प्रकार म्हणावा लागेल, अशा शब्दात या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे.

पक्षाने म्हटले आहे, मुंबईतील टोल माफी बंद होणे हे सामान्यांसाठी स्वागतार्ह आहे. टोल घेतले जातात ते रस्त्याच्या डागडूजीसाठी, मात्र अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून मुंबईचे रस्ते घडविणारे विद्यमान मुख्यमंत्री केवळ घोषणांचा पाऊस पाडू शकतात.
टोल माफी झाली असली तरी मुंबईचे रस्ते आजही जैसे थे आहेत. रस्त्यांची झालेले चाळण ही मुंबईकरांचे डोकेदुखी अजूनही गेली नाही. खड्ड्यांमुळे बळी गेलेल्या जीवांची किंमत मतांसाठी घेतलेल्या टोल मुक्तीच्या निर्णयाने कशी चुकवाल? असा प्रश्न उपस्थित करत पक्षाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.




