
भरल्या घराला दृष्ट लागायला वेळ लागत नसते असं म्हणतात. तशी राज्यात निर्माण झालेल्या भरल्या घरच्या महाविकास आघाडीलाही अशीच दृष्ट लागली आहे. डोक्यात अहंकार गेला की जे व्हायचं ते महाविकास आघाडीच्या नेत्यांचं विशेषत: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचं झालं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज ठरू पाहत असलेली महाविकास आघाडी अहंकाराने अवदसेच्या आहारी गेली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाने हुरळून जाऊन काहीही केलं आणि कसंही वागलो तरी लोकं आपल्यालाच मतं देतील, असल्या स्वप्नात आघाडीचे नेते आहेत. त्यातल्या त्यात उध्दव ठाकरे यांच्या एकूणच दावेगिरीने महाविकास आघाडीला आलेली बरकत ते घालवायला निघालेत की काय, या शंकेला वाव आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी सांगलीच्या एका जागेसाठी केलेल्या हट्टानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून उध्दव ठाकरे काहीच शिकायला मागत नाहीत, असं दिसतं. सांगली हा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्यात वसंतदादांचे नातू विशाल हे काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र कोणीतरी चंद्रहार पाटील पेहलवान आपल्याकडे आल्याचा आव आणत त्या जागेसाठी उध्दव यांनी आकाशपाताळ एक केलं. संजयकाका या दोनवेळ निवडून आलेल्या उमेदवारापुढे महाविकास आघाडीतील अशी फूट भाजपला वर्णीच होती. मात्र याही परिस्थितीत संजयकाका यांचा पराभव करत विशाल एक लाख मतांच्या फरकाने मोठ्या दिमाखात विजयी झाले. सांगलीच्या एका जागेचा परिणाम कुटुंबप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे विधानसभेवेळी विचारात घेतील, असं वाटत होतं. पण अहंकाराने त्यांना इतकं पछाडलं की होऊ घातलेल्या निवडणुकीत सेनेच्या वाट्यातील जवळपास २० जागा ते हातचे घालवायला निघालेत असं दिसतं. 
विधानपरिषदेच्या निवडणुकीत शेकापच्या ताब्यातील म्हणजे जयंत पाटील यांच्याकडे असलेल्या एका जागेवर मिलिंद नार्वेकर यांना उभं करून उध्दव ठाकरे यांनी आघाडीत पहिली बिघाडी केली. एक जागा मिळवली खरी. पण त्यामुळे आघाडीची गणितं चुकली. दाखले लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अनंत गितेंचे दिले जातात. गितेंच्या रायगड, रत्नागिरी, मावळा या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव का झाला याची चिकित्सा शिवसेनेने आजही केलेली दिसत नाही. सहकारी पक्षांना दोष देण्यापेक्षा पैशाच्या पोतड्यांपुढे तिन्ही उमेदवारांनी टाकलेली नांगी आणि मातोश्रीने वर केलेले हात याचा विचार जिथे केला जात नाही तिथे वास्तवाची चर्चाच खुजी ठरते. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जिगरी दोस्ती राखणारे नार्वेकर निवडून आले म्हणून शिवसेनेने खूप काही कमावलं असं नाही. उलट १३ आमदारांचा पाठिंबा जयंत पाटील यांच्या मागे उभा करणार्या शरद पवारांचा आपण अवमान करतो त्यांचा विश्वास गमावतो याचंही भान उध्दव ठाकरेंना राहिलं नाही. एकाच घरात पाच भाऊ नांदत असताना त्यांच्यात दुजाभाव करणं हे अप्पलपोटी लक्षण मानलं जातं. घरात कलह होतो आणि कुटुंबं असं उघडं पडतं. हे होता नये, यासाठी पवारांनी केलेले फोन जिथे घेतले जात नाहीत, तिथे इतरांच्या मानमरातबाचा विषयच निकाली निघतो. महाविकास आघाडीला आजवर मदत करत आलेल्या लहान गटांना विश्वासात न घेता त्यांच्याच जागांवर परस्पर उमेदवार उभे करून उध्दव ठाकरे यांनी आगीत तेल ओतण्याचं पाप केलं आहे. यामुळे शेकापनंतर आता समाजवादी पार्टी आणि कम्युनिस्ट पक्षाने स्वत:ची चूल निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे थेट परिणाम शिवसेनेच्या उमेदवारांच्या पराभवात होतील, हे सेनेच्या पक्षप्रमुखांना कळत कसं नाही? विषय होता १२-१५ जागांचा. इतकाही उदारपणा दाखवला जाणार नसेल तर प्रत्येकाला आपला पक्ष प्यारा आहेच, तो आपल्या पक्षाची ताकद दाखवायला कमी करणार थोडंच? पाच सात हजार मतंही अशावेळी पराभवाची पेरणी करत असतात. याला उपद्रवमुल्य म्हणतात. ते टाळणं ही तिन्ही घटक पक्ष प्रमुखांची जबाबदारी होती. ती सेनेने अव्हेरली.
मुंबईतल्या मानखूर्द आणि भिवंडी या दोन जागांवर समाजवादी पार्टीचे विद्यमान आमदार आहेत. त्याही जागा सोडण्याची तयारी आघाडीतल्या बड्या पक्षांची नाही. परभणी, पंढरपूर, निफाड, रामटेक, अकोला पूर्व, पाटण, ऐरोली, नाशिकमध्य, भूम, वणी, गोवराई अशा १२ जागांवर आघाडीतील घटकपक्षाचा दावा असताना उध्दव यांनी तिथेही उमेदवार जाहीर करून आघाडीला डच्चू मारला. नांदेड येथील लोहा, सांगोल्यातील गणपतराव देशमुखांच्या विक्रमी विजयाच्या जागांवर आणि अलिबाग या तीन जागा शेकापसाठी तुलबल्य असताना त्या जागांवरही स्वत:चे उमेदवार देत शिवसेनेने दगाबाजी केली आहे. लोहा जागेवर भोसरीत भाजपतून आलेला उमेदवार देऊन शिवसेनेने शेकापचं उट्टं काढायला घेतलंय की काय असा समज होऊ लागला आहे. शेकापवरचा राग उध्दव असा काढत असतील तर त्यांना महाविकास आघाडीचं काही पडलंय असं दिसत नाही. 
रामटेक ही काँग्रेस पक्षाची परंपरागत जागा. तिथे उमेदवार जाहीर करण्याआधीच सेनेने विशाल बरबटे यांचं नाव घोषित करून टाकलं. वणी येथे वामनराव कासावार या सातत्याने विजय घेणार्या काँग्रेस उमेदवाराची घोषणा होण्याआधीच सेनेने संजय दरेकर यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. घटक पक्षांवर सुरू असलेली कुरघोडी बंडाचं निशाण फडकवायला पुरेशी आहे. सुधीर साळवी यांना शब्द देऊन पुन्हा अजय चौधरींची शिवडीतील उमेदवारी महायुतीच्या पथ्यावर पडणं तितकं शिल्लक आहे. सत्तेची उब घेण्यासाठी भाजपवासी झालेले बाळ माने हे उमेदवारी मिळत नाही म्हणून पुन्हा सेनेत आले. सेनेने त्यांना उमेदवारीही जाहीर करून टाकली. रत्नागिरीत पक्षाला वाचवणारे उदय बने मात्र रस्त्यावरच राहिले. बुलडाणाच्या मेहकरमध्ये निष्ठेने काम करणार्या शिवप्रसाद गोंधळे यांना दूर ठेवत कधीकाळी मंत्र्यांचा पीए असलेल्या सिध्दार्थ खरात यांना उमेदवारी जाहीर करून सेनेने पायावर धोंडा मारून घेतला आहे. बडनेरा संघात सेनेशी एकनिष्ठ असलेल्या प्रिती बंड यांच्याऐवजी सुनिता खराटे यांना उमेदवारी देऊन मातोश्रीवर हनुमान चालिसाबाजी करणार्या रवी राणा यांचा मार्ग मोकळा करून दिला आहे. याचा फटका एकट्या सेनेना बसणार नाही. तो महाविकास आघाडीला पाच वर्षं मागे लोटणारा आहे.
विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही तिथे शिवसेनेने बालहट्ट धरला. अखरेच्या क्षणापर्यंत तिथे निर्णय झालेला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणार्या भारतीय जनता पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत मतदार असताना या मतदाराला गृहित धरण्याचं पातक केलं जात असेल तर याचा अर्थ काय निघतो? कोणत्याही परिस्थितीत लोकशाहीची वासलात लावणारा भाजप नको, इतक्या एका कारणासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नमतं घेतल्याचा गैरफायदा शिवसेना घेऊ पहात आहे. यातूनच राज्यातील काँग्रेस नेत्यांची तोंडं दाबण्याचे उद्योग दिल्ली दरबारी सुरू आहेत. हे चित्र महाविकास आघाडीला तारणारं नाही.
निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा असं टुमणं शिवसेनेकडून लावलं जात होतं. संजय राऊत आणि अनील परब या हौशी कलाकारांनी तर आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असतील, अशी घोषणाही करून टाकली आहे. मात्र आमदार संख्येवरच मुख्यमंत्री ठरेल, अशी भूमिका शरद पवार आणि नाना पटोले यांनी घेतल्याने अडचण झाली. 
यदाकदाचित काँग्रेस हा महाविकास आघाडीतील सर्वाधिक आमदारांचा घटक पक्ष ठरला तर मुख्यमंत्री त्या पक्षाचा होणं हे सामान्य गणित होय. मात्र जागा वाटपाची आजची परिस्थिती आणि मुख्यमंत्री जाहीर करण्याची घाई लक्षात घेता शिवसेना ऐनवेळी आघाडीला छोबीपछाड देईल आणि सत्तेसाठी पुन्हा भाजपच्या मांडीवर जाऊन नाही बसली म्हणजे मिळवलं. भाजपला तेच हवंय. सारं विसरून भाजप शिवसेनेला जवळ करेल आणि मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनाही ते करायला मागेपुढे पाहणार नाही, असं चित्र दिसतंय. यशाच्या शिखरावर जाऊ पहाणार्या महाविकास आघाडीसाठी ती सत्व परीक्षाच ठरेल… पण शिवसेनाही लोकांच्या मनातून कायमची उतरेल, हे त्या पक्षाच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं.
(लेखकाशी संपर्क- ८१६९१३५२५३)

