प्रवीण पूरो | मुंबई
राज्यातील आदर्श राजकारणी समजल्या जाणाऱ्या तत्कालीन उप मुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जोरदार हल्लाबोल करत मोठा गौप्यस्फोट केला. भाजपने सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांवर आरोप करत रान उठवलं होतं. मात्र, सिंचन घोटाळ्याची खुली चौकशी करण्यासाठी आर. आर. पाटील यांनी फाइलवर सही केली होती, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. 

हा केसानं गळा कापण्याचा धंदा आहे, असं सांगत अजितदादांनी आर. आर. आबांचे तासगावातील राष्ट्रवादीचे काँग्रसचे (अजित पवार) संजयकाका पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) उमेदवार म्हणून आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी अर्ज भरला आहे.
संजयकाका पाटील यांच्याकरता आयोजित प्रचार सभेत अजितदादा पवार बोलत होते. तेव्हा, सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांनी आर. आर. पाटील यांच्यावर खापर फोडलं. अजितदादा म्हणाले, माझ्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. पण, १९६० पासून ते माझ्यावर आरोप लागेपर्यंत कर्मचाऱ्याच्या पगारांवर ४२ हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. मात्र, माझ्यावर ७० हजार कोटींचा आरोप केल्यानं माझी वाटच लागली.

माझ्यावर आरोप झाल्यानंतर एक फाइल तयार करण्यात आली. ती फाइल गृहखात्याकडे गेली. माझी चौकशी करण्यात यावी म्हणून आर. आर. आबांनी सही केली होती. हा केसानं गळा कापण्याचे धंदा आहे, असं अजितदादांनी म्हटलं.
२०१४ मध्ये राष्ट्रवादीनं पृथ्वीराज बाबा यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि राष्ट्रपती राजवट लागली. सरकार गेलं. तेव्हा, तत्कालीन राज्यपालांनी म्हटलं, मी सिंचन घोटाळ्याच्या फाइलवर सही करणार नाही. निवडून आलेले मुख्यमंत्री करतील.
त्यानंतर २०१४ मध्ये फडणवीस यांचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्याच्या फाइलवर सही केली. त्यावेळी फडणवीसांनी मला त्यांच्या घरी बोलावून घेतलं. फडणवीसांनी सांगितलं, ‘सिंचन घोटाळ्याच्या फाइलवर सही मुख्यमंत्र्यांसाठी राहिली होती. पण, तुमच्या आबांनी तुमची खुली चौकशी करण्यासाठी सही केली होती. खरेच त्यावर आबांची सही होती. मला पाहून वाईट वाटलं. आपलं काहीतरी चुकलं असेल, म्हणून मला कामाला लावलं, असं अजितदादा म्हणाले.

अजित पवारांच्या या आक्षेपाचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला. ज्यांनी गैर केलं त्यांची चौकशी करण्याच्या सूचना चुकीच्या कशा असू शकतात असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. चुकीचं काही केलं नसेल तर अजित पवार घाबरले का? अशी विचारणा वडेट्टीवार यांनी केली. चोर तो चोर वर शिरजोर असा हा प्रकार असल्याचं विरोधी पक्षनेते म्हणाले.

