मुंबई, विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात आता खऱ्या अर्थाने हालचालींना वेग आला आहे. पुढील महिन्यात म्हणजेच मे २०२६ मध्ये या जागा रिक्त होत असून, त्यासाठी आयोगाने १२ मे २०२६ ही मतदानाची तारीख निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी ५ वाजता निकालही जाहीर केला जाणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या एकाच दिवसाकडे लागले आहे.
येत्या १३ मे रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आणि राजेश राठोड या नेत्यांचा समावेश आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि रमेश कराड हे सदस्यही निवृत्त होत आहेत.
या दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपणार असल्याने त्यांच्या जागी आता कोणाची वर्णी लागते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेतील पक्षीय संख्याबळाचा विचार करता, भारतीय जनता पक्षाला ५ जागा मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडी १ जागा जिंकू शकते, असे सध्याचे गणित आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली १३ अतिरिक्त मते आणि महायुतीने एखादा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. अशा परिस्थितीत ही निवडणूक चुरशीची ठरेल आणि मोठ्या प्रमाणावर राजकीय डावपेच पाहायला मिळतील.
मुख्य निवडणुकीसोबतच, डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. डॉ. सातव यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताना आमदारकीचा राजीनामा दिला होता, त्यांची मुदत जुलै २०३० पर्यंत होती. आता या जागेसाठीही मुख्य निवडणुकीसोबतच मतदान प्रक्रिया पार पडेल.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, या संपूर्ण प्रक्रियेची अधिसूचना २३ एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी २ मे रोजी केली जाईल आणि ४ मे पर्यंत इच्छुकांना आपले अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि त्याच सायंकाळी निकालाचे चित्र स्पष्ट होईल. ही संपूर्ण प्रक्रिया १३ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.






