बुधवार, ३० ऑक्टोबर
विशेष प्रतिनिधी / मुंबई
सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात अजित पवारांची खुली चौकशी करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी फाईलवर सही केल्याची माहिती उघड करत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीयतेचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात राज्यपालांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केली आहे. 

अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

खासदार राऊत म्हणाले, आर. आर. पाटील अत्यंत प्रामाणिक आणि कर्तबगार व्यक्ती होते. त्यांनी गृहमंत्री म्हणून कधीच चुकीचं काम केलं असेल असं आम्हाला वाटत नाही. त्यांचे केस फार लहान असल्याने ते केसाने गळा कापू शकत नाहीत, असा टोला राऊत यांनी अजित पवारांना लगावला.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्यावर सही केल्याचे अजित पवारांनी जनतेला दाखवले. तसेच फडणवीस यांनी त्यांना सही केल्याचे दाखवले. याकरता आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यपालांनी गुन्हा दाखल करायला हवा. या दोघांनी संविधानाप्रमाणे गोपनीयतेची शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर अशी माहिती सार्वजनिक करणे, हा गोपनीयतेचा भंग असून तो मोठा गुन्हा आहे. या कारणाने राज्यपालांनी या दोघांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिले पाहिजेत, अशी मागणी राऊत यांनी केली.

महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. तथापि ९० टक्के नाराजांची समजूत काढण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, असा दावा त्यांनी केला. आता आम्ही एकत्र बसणार आहोत. आमच्या प्रत्येक घटक पक्षाने उमेदवारी अर्ज भरलाय. त्यांची समजूत काढू. महाविकास आघाडीला निवडणूक जिंकायची असल्याकारणानं दोन-चार जागा मित्रपक्षानं जास्त लढवल्या किंवा जिंकल्या तर इतर घटक पक्षांना त्यात वाईट वाटण्याचं कारण नाही.
विदर्भामध्ये काँग्रेस मजबूत असल्याकारणाने तिथे त्यांच्या जास्त जागा आहेत. या राज्यात आम्हाला बदल घडवायचा आहे. यासाठी आम्हाला एकत्र राहणं फार गरजेचं आहे. बंडखोरी केलेल्या उमेदवाराची समजूत काढण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. त्यात यशस्वी होऊ, असं ते म्हणाले.



