
गुरुवार, ३१ ऑक्टोंबर
संगमनेर – मराठा आरक्षण आंदोलनाने चर्चेत आलेले आणि लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका देणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका विधानसभा निवडणुकीत देखील निर्णायक ठरणार असल्याचे चिन्ह आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले दत्तात्रय रावसाहेब ढगे हे जरांगे यांचे उमेदवार असतील.

छात्र भारती संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी राज्य स्तरावर काम करणारे, सातत्याने व्यवस्थेची झगडणारे ढगे विधानसभा निवडणुकीत उतरले असून संगमनेर मतदार संघाचे विद्यमान आमदार महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात, सत्ताधारी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना फाईट देतील. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ढगे यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 
मी एक सर्वसामान्य शेतकरी आणि विडी कामगाराचा मुलगा आहे. महाविद्यालयीन जीवनापासून छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कामात अग्रेसर आहे. छात्र भारती विद्यार्थी संघटनेचा राज्य अध्यक्ष असताना सरकारने मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात छात्र भारतीच्या माध्यमातून राज्यभर रान उठवले. परिणामी सरकारला आपला निर्णय स्थगित करावा लागला. हजारो मराठी शाळा वाचल्या. आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी (DBT) च्या प्रश्नावर त्यांनी मोठे आंदोलन उभे करून सरकारला निर्णयाचा फेरविचार करण्यास भाग पाडले. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दारात शेकडो विद्यार्थ्यांना गनिमी काव्याने घुसवत आंदोलन केले होतें. मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांवर देखील विशेष काम केले आहे. 

BBA/BCA च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती सरकारने अचानक बंद केल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार होते. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात हजारो विद्यार्थ्यांसह अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद केले होते. संगमनेर तसेच राज्यातील महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची बेकायदेशीर फी च्या नावावर होणाऱ्या लुटीविरुद्ध लढा देत शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांचे कोट्यावधी रुपये परत करण्यास भाग पाडले आहे. विद्यार्थी जीवनातच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्राणपणाने लढा देऊन राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले. विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावतानाच पुणतांबा शेतकरी संपावेळी हिवरगाव टोल नाका येथे राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचे काम शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन केले होते. सध्या राज्यभर गाजत असलेल्या दुधदर आंदोलनात आणि शेतकऱ्यांना दुधाला अनुदान मिळवून देण्यात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

इथ दोन बलाढय सत्ताधाऱ्यांमध्ये जी काही सुरू असलेली लढाई दिसत आहे. त्या लढाईत सर्वसामान्यांचे प्रश्न हरवले आहेत. जी काही जाळपोळ एकमेकांना धमकावून सुरू आहे, ही लढाई त्यांची आणि त्यांच्या लाभार्थ्यांची आहे. त्यामुळे माझी उमेदवारी ही सर्व सामान्य माणसासाठीची आहे. ज्यांचे रोजगाराचे, शिक्षणाचे शेतीचे प्रश्न गंभीर आहेत. शिक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचे झालं तर जयाताईंनी काल परवा जे विधान केलं की माझा एकटीच बाप नाही तर सात लाख लेकरांचा बाप आहे. मी फार सकारात्मकदृष्टीने त्यांच्या या विधानाकडे बघतो. आपल्याकडे एखाद्या माणसाला व्यापक अर्थाने बाप माणूस म्हणण्याची पद्धत आहे.
मात्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांनी केलेले एक विधान माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या जाहीर सभांमधील भाषणातून तालुक्यात चर्चेत आणले गेले. दोन्ही नेत्यांच्या याच विधानाच्या अनुषंगाने दत्ता ढगे म्हणाले, जयाताई भाषणा दरम्यान हे सांगायचे विसरल्या की त्यांची सख्खी भावंड वगळता इतर सर्व भावंड सावत्र लेकरं आहेत. ताईसोबत असणारे सर्वच विद्यार्थी त्यांच्या समवेत मेडिकलला जाऊ शकले नाही. बुद्धिमत्ता आणि इच्छा असूनदेखील डॉक्टर होऊ शकले नाही. आर्थिक परिस्थिती आणि अन्य कारणांमुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकले नाही, कारण त्यांचे वडील थोरात साहेब नव्हते.
आत्ता देखील इंजीनियरिंग, फार्मसी करणारी भरपूर गोरगरीब पोरं आहेत. शिक्षणाच्या तळमळीने कुठेतरी काम धंदा करून ही पोर शिकण्याचा प्रयत्न करतात. आर्थिक परिस्थिती आणि कामधंद्यामुळे महाविद्यालयात नियमितपणे जाता येत नाही. त्यामुळे महाविद्यालय बुडाले तरी फाईनच्या नावाखाली त्यांना पैसे भरावे लागतात. या गोरगरीब पोरांना आजही म्हटले जात आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार थोरात साहेब खरंच या विद्यार्थ्यांचे पालक आहेत का? अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
रोजगाराच्या मुद्द्यावर बोलायचे झाले तर गेल्या चाळीस वर्षात एक साधी एमआयडीसी देखील मतदार संघात येऊ शकली नाही किंबहुना ती आणली गेली नाही याची कारणदेखील त्यांनाच विचारावं लागतील. मतदार संघात एखादी एमआयडीसी आणली गेली असती तर स्थानिक पातळीवर तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला असता. असं झालं असतं तर त्यांच्या संस्थांना स्वस्तातील लेबर, जी हुजूर करणारे लोक मिळाले नसते.
मतदार संघात रोजगार निर्माण झाले असते तर आजही गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न अडकून राहिली नसती. हेही या पोरांची लग्न न होण्याचे एक प्रमुख कारण आहे. चांगला रोजगार नसल्याने आर्थिक शाश्वती नाही, यांच्या संस्थांमध्ये आठ दहा वर्षांपासून आठ ते दहा हजारावर काम करणारे पोरं म्हणतात की एकतर परमनंट करा किंवा आमचे लग्न तरी लावून द्या. आयुष्यभर आम्हाला वेठबिगार ठेवला तरी चालेल अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.
तालुक्यातील पारेगाव सारख्या एखाद्या ओसाड माळरानावर सर्वसामान्य शेतकऱ्याचे पोरग आयटी कंपनी उभं करू शकत सर सत्तेत असलेल्यांनी ठरवलं असतं तर संगमनेर देखील आयटी हब होऊ शकल तालुक्याच्या दोन्ही पठार भागात आयटी हब उभे राहिले असते तर सर्वसामान्य दुष्काळी भागातील माणसांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झाला असता. आजही कितीतरी पोर वणवण करत मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद, दिल्ली आदी ठिकाणी रोजगाराच्या शोधात जातात. हीच संधी त्यांना स्थानिक पातळीवर देखील उपलब्ध होऊ शकली असते.
आरोग्य व्यवस्थेबद्दल तर येथे बोलायलाच नको या व्यवस्थेचा येथे पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक वर्षाच्या सत्तेत हे सरकारी दवाखान्याची परिस्थिती बदलू शकले नाहीत. त्याच्या दुरवस्थेबद्दल कुठल्याही संगमनेरकराला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. गोरगरीब चांगले उपचार घेऊ शकतील असे एखादे सरकारी हॉस्पिटल स्थानिक नेते येथे उभ करू शकले नाही.
“माझी लढाई ही सरंजामदार यांच्या विरोधातील असून समाजवादी विचार, डावा विचार जिवंत ठेवण्यासाठी आहे. माझ्यात नसेल आज या विचारांचा सूर्य होण्याची ताकद मी नसेल फार प्रकाश पडू शकणार पण या घनदाट वैचारिक अंधाराच्या काळात माझ्या विचारांची पणती लावण्याचे तिच्यात तेल ओतत राहण्याच काम मी करत राहील”.

