मुंबई, विशेष प्रतिनिधी –
महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत असून राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक आता बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून, याबाबतची औपचारिक घोषणा १६ मार्च रोजी केली जाणार आहे.
या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागांचे वाटप झाले होते. महायुतीच्या वाट्याला सहा जागा आल्या होत्या, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने चार जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. भाजपच्या वतीने राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना संधी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे रिंगणात होत्या. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे.
आज विधानभवनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, कोणत्याही अतिरिक्त उमेदवाराने अर्ज न भरल्यामुळे मतदानाची प्रक्रिया टळली असून सातही नेत्यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे राजकीय संघर्ष टाळून सर्व पक्षांनी सामंजस्याने ही निवडणूक पार पाडल्याचे चित्र दिसत आहे.



महाराष्ट्रातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध; सात जागांसाठी सातच अर्ज, नवनियुक्त खासदारांची नावे निश्चित; यांना मिळाली संधी
राजकीय संघर्ष टाळून सर्व पक्षांनी सामंजस्याने ही निवडणूक पार पाडल्याचे चित्र दिसत आहे.

