संगमनेर – अनंत पांगारकर
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या गावांमध्ये चार सभांच्या माध्यमातून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत टायगर अभी जिंदा है! म्हणणारे माजी खासदार ‘दादा’ निवडणुकीत उभे राहण्याऐवजी मतदारसंघातूनच गायब झाले. त्यामुळे दादा प्रेमी कार्यकर्त्यांनी दादा हे वागणं बरं नव्हं… अशा शब्दात खाजगीत बोचरी टीका सुरू केली आहे. त्यामुळे टायगर जिंदा आहे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करणारा टायगर आता नेमका कुठे गेला, यामागे काही गौड बंगाल आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दादा उत्तरेत विशेषत: संगमनेर विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत देत त्यांनी जिल्हा परिषद गटांमध्ये सभांचा धडाका लावला. यावेळी प्रथमच थोरातांना निवडणुकीत टस्सल देणारा आणि मॅनेज न होणारा चेहरा मिळाल्याने विरोधकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. सभांच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जाण आणली. संगमनेरची निवडणूक ते आता कोणत्याही परिस्थितीत लढवतीलच, अशा टप्प्यावर आल्यानंतर त्यांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला आणि थोरात यांच्या विरोधात भाजपमधून समर्थक असलेल्या अमोल खताळ यांचा चेहरा शिंदेंच्या शिवसेनेकडून ऐनवेळी समोर आणला गेला. त्यामुळे निवडणुकीतील रंगत निघून गेली.
निवडणूक रंगात येऊ लागली असताना महायुतीतील अंतर्गत नाराजी समोर येऊ लागली आहे. मतदार संघांमध्ये सभा घेऊन वातावरण निर्मिती करणारे दादा निवडणूक सोडून ऐनवेळी कोठे गायब झाले असा प्रश्न समर्थक कार्यकर्ते खासगीत विचारत आहे. विखे-थोरात हे पारंपारिक राजकीय विरोधक प्रथमच निवडणुकीत एकमेकांविरोधात मैदानात उतरणार असल्याने हा मतदारसंघ राज्यात हाय व्होल्टेज ठरला होता. राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. मात्र आता तो फुसका बार ठरला आहे.
पिता-पुत्रांची पक्षीय ताकद आणि दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत असलेली पोहोच लक्षात घेता संगमनेर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी ते सहजपणे भाजपाकडे खेचून आणतील अशी परिस्थिती निर्माण झाली असताना अचानकपणे जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. तरीदेखील दादांना शिवसेनेकडून उमेदवारी अवघड नव्हती. मात्र त्यांनी संगमनेरकरांना उमेदवारी न करता पुन्हा एकदा हुलकावणी दिली.
दक्षिणच्या निवडणुकीत पराभवामुळे जखमी झालेला टायगर डरकाळी फोडत बाळासाहेब थोरात यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत तुटून पडल्याने टायगर खरोखरच जिंदा आहे असे चित्र निर्माण झाले असताना ऐनवेळी संगमनेर विधानसभा निवडणुकीतून टायगर गायब झाल्याने टायगरला डोक्यावर घेऊन नाचणारे कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले असून ‘दादा हे वागणं बरं नव्ह’ असे म्हणू लागले आहे, एवढं मात्र नक्की!

