विशेष प्रतिनिधी / मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या आठ बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना सर्वाधिक डोकेदुखी बंडखोरांनी दिली आहे. महायुतीमध्ये तीन-तीन पक्ष एकत्र आल्यामुळे अनेक नेत्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली नाही, त्यातील काहींनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केली. त्यातील काहींना शांत करण्याचे प्रयत्न महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केले. मात्र अर्ज मागे घेण्याची तारीख निघून गेली आणि आता प्रचाराला सुरुवात झाल्यानंतरही बंडखोर मागे हटायला तयार नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरु करण्यात आली आहे.
निलंबनाची कारवाई करताना तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारसंघातील तिकीट वाटप केले आहे. तथापि, काही पदाधिकाऱ्यांनी घटक पक्षांच्या उमेदवारांविरोधात नामांकन भरत पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. 
या पार्श्वभूमीवर, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार या बंडखोर पदाधिकाऱ्यांविरोधात पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊन त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.
खासदार तटकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात आठ जणांना निलंबित करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेड महिला जिल्हाध्यक्षा पुजा व्यवहारे, धुळ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, दहिसर तालुकाध्यक्षा ममता शर्मा, तुमसर (भंडारा) तालुकाध्यक्ष धनेंद्र तुरकर आणि युवक प्रदेश सचिव आनंद सिंधीकर यांचा समावेश आहे.

