निवडणूक विशेष – अनंत पांगारकर
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या दत्तात्रय रावसाहेब ढगे या एकमेव तरुण अपक्ष उमेदवाराने “माझे संगमनेर माझा संकल्प” असं म्हणत मतदारांसमोर आपले संकल्प पत्र ठेवले आहे. या संकल्प पत्राच्या माध्यमातून ढगे मतदारांसमोर जात आपली भूमिका मांडत आहे.
संगमनेर विधानसभा मतदार संघातून राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात नवव्यांदा महाविकास आघाडीकडून तर त्यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे अमोल खताळ महायुतीकडून निवडणूक लढवत आहे. काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. यातच या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या दत्तात्रय ढगे शिट्टी या चिन्हाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. आपले संकल्प पत्र मतदारांसमोर ठेवणारे ते पहिलेच उमेदवार ठरले आहे.
अल्पभूधारक व विडी कामगार असलेल्या कुटुंबात जन्म झालेल्या उमेदवार दत्तात्रय ढगे यांच्या संकल्प पत्रात नेमकं काय आहे याचा महाराष्ट्र संवाद न्यूज वेब पोर्टलने घेतलेला आढावा…
मी दत्तात्रय रावसाहेब ढगे. एक शेतकरी कुटुंबातील तरुण या विधानसभा निवडणुकीला सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून अपक्ष उभा आहे. संगमनेर-राहाता येथील प्रस्थापित राजकीय घराण्यांच्या दृष्टचक्रात तालुक्यातील जनता अडकली आहे. ही घराणी एकमेकांचे विरोधक सांभाळून वेळेला एकमेकांशी सेटलमेंट करून स्वतःची सत्ता अबाधित ठेवतात. जनतेचा अभिमन्यू झाला आहे. दोघांचं राजकीय चारित्र्य एकच आहे. तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं करतो. हे त्यांना म्हणतात, ते दहशत करतात. ते यांच्याबद्दल तेच म्हणतात. यांची मुलगी त्यांच्या मुलाला युवराज म्हणते, त्यांचा मुलगा यांच्या मुलीला राजकुमारी म्हणतो. थोरातांची मुलगी म्हणते माझ्या बापाबद्दल काही बोलाल तर याद राखा. विखे पुत्र म्हणतात विखे साहेबांबद्दल काही बोलाल तर तिथंच गाडीन. मी म्हणतो यात सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत कुठं?
म्हणूनच सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्या मरणाच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी माझी उमेदवारी आहे. जनता लाचार राहिली पाहिजे, आपण फेकलेल्या तुकड्यांवर जगत राहिली पाहिजे म्हणजे आपली सत्ता अबाधित राखता येते, या भावनेतून प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक तालुक्यात स्वतःच्या ताब्यातील संस्थांव्यतिरिक्त नवे उद्योग येऊ दिले नाहीत. नदीच्या पट्ट्यात जी काही समृद्धी दिसते आहे ती इथल्या शेतकरी, कष्टकरी, मजूर बांधवांच्या घामावर आणि सचोटीने व्यवसाय करणाऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. जिल्हा झाल्यास उद्योग व्यवसाय वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, नवी रोजगार निर्मिती होईल, लोक लाचारीतून बाहेर पडतील म्हणून या दोघांनी महसूलमंत्री असूनसुद्धा संगमनेर जिल्हा होऊ दिला नाही की मतदारसंघात एमआयडीसी येऊ दिली नाही, कि मोठे उद्योग मतदारसंघात येऊ दिले नाहीत.
माझा विकासाचा दृष्टीकोन: रोजगार-उद्योग-व्यापार
१. गाव तिथे फार्मर प्रोडुसर कंपनी व त्यामार्फत शेती आधारित छोटे प्रक्रिया उद्योग गावपातळीवर सुरू करण्यासाठी पुढाकार. यातून रोजगारनिर्मिती होऊन तालुक्यातील अर्थव्यवस्थेचे विकेंद्रीकरण होईल.
२. संगमनेर जिल्हा निर्मिती, यातून लोकांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी १०० किमी पार करून जाव लागणार नाही. स्थानिक पातळीवर उद्योग व्यवसायांना चालना मिळून मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगार निर्मिती होईल.
३. नदीचा पट्टा वगळता मोठा भाग दुष्काळी आहे. या भागात एमआयडीसी आणणार, त्यातून तरुणांना स्थानिक पातळीवर कौशल्याधारित रोजगार निर्मिती होईल.
४. पठारभाग आणि तळेगाव पट्टयात आयटी हब उभारणी व एमएनसी कंपन्या आणणार, यातून सुशिक्षित तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल.
५. व्यावसायिक बनू पाहणाऱ्या होतकरू तरुणांना भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून विविध महामंडळांच्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी सहायता केंद्र उभारणार. निधी बँक उभ्या करून त्यामार्फत तरुणांना भांडवल उभे करून देणार.
शेतीमातीसाठी…
१. प्रत्येक शेतापर्यंत मालवाहतूक करणारे वाहन पोचावे यासाठी शिवार रस्ते व त्यावर पथदिवे बसविणार.
२. भाजीपाल्यासारखे नाशवंत पदार्थ अधिक काळ टिकावेत यासाठी शीतगृह उभारणी.
३. फिरते माती परीक्षण व शेती मार्गदर्शन केंद्र निर्मिती, शेतकऱ्याला घरबसल्या मदत व माहिती मिळेल.
४. सुसज्ज आधुनिक भाजी मंडईची निर्मिती, यातून शेतकरी विक्रेते व ग्राहक यांना मालाची खरेदी विक्री करणे सुलभ सोयीचे होईल.
५. शेतमाल विक्रीसाठी पारदर्शी विक्री व पणन व्यवस्था.
६. कृषी उत्पादनांसाठी निर्यात व्यवस्था.
७. शेतीमालाला हमीभावाचा कायदा व्हावा.
८. दुधाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव.
९. शेतीसाठी लागणारी खते, औषधे, बी-बियाणे, अवजारे यावर 0% GST.
१०. शेती हा राज्याच्या सूचितील विषय असताना केवळ भाव नियंत्रण करण्यासाठी होणाऱ्या केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाविरुद्ध जनजागृती, जन आंदोलन.
११. शेती आधारित छोटे उद्योग गावपातळीवर सुरू करण्यासाठी पुढाकार.
१२. जगाला पोसण्यासाठी आपलं आयुष्य झिजवणाऱ्या शेतकऱ्याला वृद्धापकाळातील आयुष्य सन्मानाने जगता यावं यासाठी शेतकरी सन्मान पेन्शन सुरु करणे.
पर्यावरण…
पर्यावरणीय बदलामुळे शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार. प्रामुख्याने प्रवरामाईचे संवर्धन आणि संरक्षण यासाठी काम करणार.
शिक्षण…
१. प्रत्येक मुलाला घराजवळच सरकारी खर्चाने जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी नगरपालिका तसेच जिल्हा परिषद शाळांचे आधुनिकीकरण.
२. प्रत्येक गावात सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका सुरु करणार, यालाच जोडून सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी व स्पर्धा परीक्षांसाठी मदत व मार्गदर्शन केंद्र.
३. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या गरीब तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना ५०% ऐवजी एससी आणि एसटी प्रमाणेच १००% शिष्यवृत्ती मिळवून देणे.
४. समाजकल्याण तसेच आदिवासी विभागाच्या वसतिगृहांची संख्या वाढविणे.
५. आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरावर वसतिगृह निर्मिती.
६. केजी ते पीजी मोफत शिक्षणासाठी सुरु असलेला लढा सुरूच ठेवणार.
आरोग्य…
१. गाव तिथे व्यायामशाळा व योगा केंद्र सुरु करणे.
२. सर्व नागरिकांना पिण्याचे शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे.
३. नवीन उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती.
४. ग्रामीण रुग्णालय आधुनिक सुविधांनी सुसज्ज करणे.
५. सर्व ग्रामीण भागातील दवाखाने (पीएचसी) ठिकाणी सर्व प्रकारची औषधे आणि उपचार उपलब्ध करणे.
६. दुर्धर, गंभीर व खर्चिक आजारांसाठी आरोग्य निधीची निर्मिती.
आणखी महत्त्वाची कामे…
१. विजेचे अवाजवी दर आणि बिले यांवर नियंत्रण आणणार.
२. विजेचा ट्रान्सफार्मर खराब झाल्यास ४८ तासात बसविणे बंधनकारक आहे, तो उपलब्ध करणार अन्यथा नियमाप्रमाणे ग्राहकांना ५० रुपये तासाप्रमाणे जेवढा वेळ बंद तेवढे पैसे परत मिळवून देणार.
३. प्रभाग पद्धत आणून नगरपालिका निवडणुकांमधून सर्वसामान्य माणसाला हद्दपार केले आहे. वार्ड पद्धत पूर्ववत करणे.
४. ग्रामसभेच्या व वार्ड सभेच्या अधिकारांबाबत जनजागृती व आमदार निधीतून प्रत्येक गावात सरकारी योजनांची माहिती देणारे केंद्र सुरु करणे.
५. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना घरगुती उद्योग चालवण्यासाठी प्रोत्साहन, प्रशिक्षण, बीजभांडवल उपलब्ध करून देणार.
६. गावोगावी आमदार निधी तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुलींसाठी क्रीडांगणे तयार करणार.
७. महिला सुरक्षेसाठी राज्यसरकारच्या माध्यमातून समुपदेशन केंद्र, तक्रार निवारण केंद्र तसेच तज्ज्ञांच्या आणि सामाजिक संस्थांच्या साह्याने गावोगावी उपक्रम राबवणार.
८. अल्पसंख्य व बहुसंख्य समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी सतत कार्यरत राहणार. माजी सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी राबवलेला भिवंडी पॅटर्न तालुकाभर राबवून शांतता, सौहार्द आणि सुरक्षिततेचं वातावरण तयार करणार.
माझा परिचय…
माझा जन्म एका विडी कामगार व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात झाला. आई विडी कामगार. दिवसाची सुरुवात पहाटेच्या अंधारात दोन्ही बाजूने उंच वाढलेल्या उसाच्या मधल्या पाऊलवाटेने डोक्यावर दुधाची किटली आणि डोक्यात बिबट्याची भीती घेऊन डेअरीला दूध घालण्यापासून होत असे. सकाळी-सकाळी शहरात घरोघर दूध पोहोचवून परतीच्या वाटेवर घरोघर वर्तमानपत्र टाकणे हे सर्व केले आहे. नंतर घरी आल्यावर विडी कामगार असलेल्या माझ्या आईला विड्यांचा दोरा बांधायला मदत करणे हे देखील केले आहे. त्यामुळे, मला सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, वंचित समाजाच्या जीवनाशी निगडीत प्रश्नांची जाण आहे. ते म्हणतात ना, जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे… तसच काहीसं.
शाळेला जाऊन-येऊन दररोज दहा किलोमीटरची पायपीट केलेली आहे. शाळेत भरायला पैसे नव्हते, त्यामुळे बऱ्याच वेळा शाळा बुडवून घरी थांबावे लागले आहे. सर्वसामान्यांना शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचा मी वाटसरू राहिलो आहे. यातूनच मी ऐन तारुण्यात उमेदीच्या काळात छात्र भारती संघटनेच्या माध्यमातून सर्वसामन्यांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झोकून देऊन काम करण्यास जी सुरवात केली ती आजही शिवआर्मीच्या माध्यमातून चालूच आहे. त्यातील काही ठळक कामे आपणासमोर मांडत आहे. इथे केलेल्या कामाची प्रसिद्धी करणे हा हेतू नाहीं. यात सांगायचा भाग हा आहे की हातात अधिकार नसतानाही मी खालील कामे केली असून जर हातात अधिकार आले तर काय व्याप्तीचे काम करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न आहे.
ठळक कामे…
- संगमनेरमधील शाळा महाविद्यालयांनी बेकायदेशीरपणे फीच्या नावाखाली वसूल केलेले कोट्यावधी रुपये आंदोलनाच्या माध्यमातून परत मिळवून दिले.
- आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासंदर्भातील विविध प्रश्न तसेच डीबीटीच्या प्रश्नासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत.
- ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या दारात निदर्शने करून सात दिवस तुरुंगवास भोगला आहे.
- राज्यातील सरकारी शाळा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात छात्र भारतीच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन उभे करून सरकारला निर्णयाचा फेरविचार करण्यास भाग पाडले.
- पुणतांबा शेतकरी संपावेळी हिवरगाव पावसा टोल नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.
- यावर्षी शेतकऱ्यांच्या दूध दराबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी गावोगाव फिरून जन जागृती करून शिवआर्मी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दुधाला उत्पादन खर्चावर आधारित किमान ४० रुपये दर मिळावा यासाठी संगमनेर तालुक्यात मोठे जनआंदोलन उभे केले. सरकारने ५ रु. अनुदानाची तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी कायमस्वरूपी हमीभाव मिळण्यासाठीची ही लढाई यापुढेही सुरूच राहील. सर्वसामन्यांच्या अशा अनेक प्रश्नांवरती संघर्ष करत आलो आहे आणि यापुढेही करत राहीन.
माझा चरितार्थ चालवण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून मी कन्सल्टंसीच्या व्यवसायात उतरलो असून आता या व्यवसायात माझा चांगला जम बसला आहे. त्यामुळे, नव्याने उद्योग व्यवसायात उतरू पाहणाऱ्या तरुणांच्या संघर्षापासून ते उद्योग-व्यवसाय करत असणाऱ्यांच्या प्रश्नांची देखील मला व्यवस्थित जाण आहे.
छात्र भारती आणि राष्ट्र सेवादलाच्या मुशीत माझी वैचारिक जडण-घडण झाली आहे. आपण मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून द्यावं. मी आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वस्व झोकून देऊन काम करीन. आजपर्यंतच्या आयुष्यात मला अनेक आर्थिक प्रलोभने, मोठ्या राजाश्रय तथा मोठ्या राजकीय पदांची प्रलोभने दाखवली गेली. मी विकलो न गेल्याने मग भीती दाखवली गेली, धमकावले गेले, तरीही मी सर्व सामान्यांसाठीच्या संघर्षातून कधीच माघार घेतली नाही. माझी तत्वे आणि विचारांशी कधीच तडजोड केली नाही आणि यापुढे देखील करणार नाही. आपण सर्व आपल्या या लेकराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मतरुपी आशीर्वाद द्याल, या विश्वासासह… सप्रेम जय भारत !
आपलाच,
दत्तात्रय रावसाहेब ढगे

