मंगळवार १२ नोव्हेंबर
अहिल्यानगर – अहिल्या नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये २४ नोव्हेंबर २०२४ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.
सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. 
आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
सध्या राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे. राज्यभरातील २८८ मतदार संघात २० नोव्हेंबरला मतदान होत असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन नवे सरकार राज्यात सत्तारूढ होईल. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वत्र राजकीय सभांनी, प्रचाराने वेग घेतला. जिल्ह्याच्या काही भागात घडलेल्या अनुचित प्रकारामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला महत्व प्राप्त झाले आहे.


