विशेष प्रतिनिधी / मुंबई
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ आणि महायुतीच्या नेत्यांचा प्रचार जोरात सुरु आहेत. दोन्हीही बाजूंनी प्रचारासाठी बड्या नेत्यांची फौज मैदानात उतरलेली आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये तीन आणि महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष मैदानात आहेत. त्यामुळे जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. असाच तिढा मुख्यमंत्रिपदाबद्दल होणार का असा प्रश्न निर्माण आहे. मविआचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण? असा सवाल उद्धव ठाकरे यांना वहिनीने केला असता उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट केली. 
उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा असं आवाहन केलं होतं. मात्र अद्यापही मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरलेला नाही. दुसरीकडे शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल असं स्पष्ट केलं होतं. या दरम्यानच आता उद्धव ठाकरे यांनी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार यांच्या भूमिकेला सहमती देत उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, मी स्वागत करेन आणि त्यापुढे जाऊन सांगेन की, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यातल्या कुणाचंही नाव घोषित करावं मला फक्त महाराष्ट्रद्रोही नकोत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी इच्छा असणं किंवा नसण्यापेक्षा लोकांची इच्छा महत्वाची आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाशी यांनी गद्दारी केली. शिवसेना प्रमुखांमुळेच यांची आज पंचतारांकित शेती आहे. ही कुणाच्या जोरावर झाली? तुम्ही काय करु शकला असता आयुष्यात? तुम्हाला ज्यांनी सगळं दिलं, त्यांनाच भाजपने फसवलं म्हणून मी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं होतं. आधी पाच वर्ष आम्ही जेव्हा भाजपसोबत होतो, तेव्हा याच टीकोजीरावांनी भरसभेत भाजप नको म्हणून राजीनामा दिला होता, असं उद्धव म्हणाले.

