संगमनेर – मोहसीन शेख
विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे जात आहे. यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमुख उमेदवारांची मोठे दमछाक होत असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा मात्र वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहे. मतदारांच्या भेटीनंतर मतदार मतदानाच्या रूपाने त्यांच्या पाठीशी राहतील याबाबत त्यांना आशा आहेत.
प्रमुख उमेदवारांच्या तुलनेत आपल्या मर्यादित अशा प्रचार यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यात ते यशस्वी ठरले आहे. प्रस्थापित आणि धनशक्ती विरोधात लढणारा सामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून अजीज वोहरा यांना मतदारांची पसंती मिळत असल्याचे ते म्हणाले. वाड्या वस्त्यांवर जात ते आपली भूमिका मतदारांना पटवून देत आहेत.
शहरातील मतदारांच्या गाठीभेटीनंतर वोहरा यांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. बुधवारी त्यांनी मतदारसंघाच्या दक्षिण भागातील दौरा सुरू केला होता. संगमनेर तालुक्यातील देवगाव, शिरापूर, पिंपळगाव देपा येथे मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेताना चौका-चौकात त्यांचे स्वागत झाले. निवडक कार्यकर्त्यांसह ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पठार भागातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या साकुरमध्ये पोहचले होते. साकुरच्या बाजारतळावर त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
कार्यकर्त्यांसमवेत प्रत्येक नागरिकास भेटून व थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेत मार्गक्रमण करीत असताना त्यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत होता. प्रत्येक नागरिकांची विचारपूस करीत त्यांच्या असंतोषास वाचा फोडीत अजिजभाईंनी त्यांना बोलते केले व वंचित, सोशितांची सत्ता आणण्याचा मानस त्यांनी यावेळी मतदारांशी बोलताना व्यक्त केला.

मविआ व महायुती दोन्हीही फक्त प्रस्थापितांचे हितसंबंध जपत असल्याचा पुनरुच्चार करत जनतेने आपल्या हक्क अधिकारांबाबत जागरूक होण्याचा सल्ला दिला. तसेच प्रत्येक वेळी एकच लोकप्रतिनिधी निवडून येणे ही लोकशाही नसून हुकूमशाही असल्याचा आरोप ही त्यांनी आपल्या भाषणादरम्यान केला. त्यांचा आक्रमक प्रचार युवकांना भुरळ पाडीत असल्याचा प्रचारात जाणवले. महायुती सरकारने जनतेचा व गोरगरीब महिलांचा अपमान केला आहे. लाडक्या बहिणीच्या नावावर दीड हजार रुपये देऊन गॅस, जीएसटी, बियाणे, खते, व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवून आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रकार केला आहे. जनतेचे गरजेचे प्रश्न सोडून आपापसात भांडणे लावण्याचा प्रकार हे महायुती सरकार करीत आहे “असा देखील आरोप आपल्या छोट्या सभांमधून त्यांनी प्रस्थापितांवर केला.


