शनिवार, १६ नोव्हेंबर
संगमनेर विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून ज्या माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्या नावाचा उल्लेख करून निवडणुकीतील भाषणांना आणि थोरात यांच्यावरील टिकेला सुरुवात केली जाते, त्या खताळ पाटलांचे नातू आणि भारतीय जनता पक्षाच्या एका सेलचे पदाधिकारी असलेले विक्रमसिंह खताळ यांनी शनिवारी शिर्डीमध्ये प्रियंका गांधींच्या प्रचार सभेवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
गेल्या काही वर्षांपासून विक्रमसिंह खताळ पाटील भारतीय जनता पक्षात सक्रिय होते. गेल्या वेळी तसेच यावेळी देखील खताळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक होते. मात्र दोन्ही वेळेला त्यांचा उमेदवारीचा पत्ता पक्षातील काही नेत्यांनी कापण्यात पुढाकार घेतला. एकीकडे खताळ पाटील यांच्या नावावर राजकारण करताना दुसरीकडे त्यांच्या नातवाला पक्षात डावले जात असल्याचे खाजगीत बोलले जात होते. 
याही निवडणुकीत विक्रमसिंह खताळ यांच्या ऐवजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विखे समर्थक असलेल्या अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून दिल्यानंतर विक्रमसिंह खताळ नाराज असल्याचे बोलले जात होते. या नाराजीचा परिपाक शनिवारी शिर्डीत दिसून आला. 
शनिवारी महाविकास आघाडीच्या शिर्डीतील उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी शिर्डीमध्ये आल्या होत्या. गांधी यांच्या सभेवेळी खताळ यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राजस्थानच्या आमदार रिटा चौधरी यांनी खताळ आणि त्यांच्या पत्नीचे पक्षात स्वागत केले. संगमनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात आणि महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्यातील लढत अंतिम टप्प्यात आली असताना विक्रमसिंह खताळ यांनी भाजपाची सोडलेली साथ धक्कादायक मानली जात आहे.
या निवडणुकीत माजी मंत्री व काँग्रेस सोबत शेवटच्या क्षणापर्यंत एकनिष्ठ असलेले बी. जे. खताळ पाटील यांच्या नावाचा वापर महायुतीकडून सातत्याने केला जात असल्याचे दिसत होते. त्याच खताळ यांच्या नातवाने अखेर भाजपाची साथ सोडत काँग्रेसमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय निवडणुकीत महत्त्वाचा मानला जात आहे.

