संगमनेर – अनंत पांगारकर
विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला आहे तरी देखील सर्वच पक्षाचे निष्ठावंत म्हणविले जाणारे अद्याप प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत नाही. एकीकडे ऐनवेळी दिलेला उमेदवार आणि दुसरीकडे उमेदवाराभोवती जमलेला लाभार्थ्यांचा मेळा यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याची मोठी गोची झाली आहे. वर्षानुवर्ष विरोधात राहिल्यानंतर आता राजकीय तडजोडीमुळे ज्याला विरोध केला याचाच प्रचार करायची वेळ घेऊन ठेपल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत स्वतःला विक्रीस काढले आहे. “साहेब, कार्यकर्ता विकणे आहे” अशा मिष्कील शब्दात राजकीय पक्षांचे निष्ठावंत (नाव न छापण्याच्या अटीवर) आपले दुःख व्यक्त करत आहे.
राज्यात गेल्या पाच वर्षात राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलले आहे. कोणत्या एका पक्षाशी निष्ठावंत असणे हाच आता गुन्हा ठरतो की काय अशी भीती कार्यकर्त्यांना वाटू लागले आहे. पक्ष वाढीसाठी, पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रसंगी पदरमोड करत, केसेस अंगावर घेत, विरोधकांना अंगावर, शिंगावर घेत पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. आणि बदलत्या राजकीय गणितांनी साऱ्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. ज्याला विरोध केला त्याचा झेंडा घेऊन मिळवायची वेळ आता आली आहे. 
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर महाविकास आघाडी उदयास आली. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने आघाडी करत सत्ता स्थापन केली. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना विरोध केला त्यांचेच गोडवे गाण्याची वेळ निष्ठावंत शिवसैनिकांवर आली. मात्र पक्षाचा आदेश समजून त्यांनी या राजकीय समीकरणांशी जुळवून घेतले. तर काहींनी अलिप्त राहणे पसंत केले. परिणामी याचा परिणाम पक्ष फुटीवर झाला आणि शिवसेनेचे दोन गट पडले. आणि दोन्हीकडचे पुढारी आम्हीच निष्ठावंत म्हणू लागले. थोड्या फार फरकाने हे चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात दिसू लागले.
एकीकडे महाविकास आघाडी उदयास येत असताना दुसरीकडे अडीच वर्षांपूर्वी राज्यात फुटलेल्या शिवसेनेला सोबत घेत भाजपने महायुती स्थापन केली. येथेही कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली. ज्या शिवसेनेने सत्ता मिळण्याचा क्षण हातात आला असताना दगा दिला त्याच शिवसेनेचे पुन्हा गोडवे गाण्याची वेळ नेत्यांसह कार्यकर्त्यांवर आली. अशा स्थितीत आपला पक्ष आणि पक्षाच्या भूमिकेशी एकरूप असलेल्या कार्यकर्त्यांची मात्र मोठी पंचायत झाली. पक्षातील फुटीनंतर पडलेले दोन गट, अभद्र राजकीय युती यामुळे कोणता झेंडा हाती घ्यायचा या संभ्रमावस्थेत स्वतःला निष्ठावंत म्हणविणारे अडकले आहेत.
बदलत्या राजकीय समीकरणात होत असलेला मोठ्या प्रमाणातील पैशाचा वापर, आयाराम-गयाराम यामुळे आता निष्ठावंत कार्यकर्त्यांनाही कोणी विचारायला तयार नाही. आजच्या राजकारणात पैसाच सर्वश्रेष्ठ बनल्याने आता निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ही स्वतःला विक्रीस काढले असल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्ते खासगीत नोंदवू लागले आहे.

