भाजप महायुतीमुळे महागाईचा दहशतवाद वाढला
खोटे बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा
प्रियंका गांधी यांचा भाजपसह महायुतीवर हल्लाबोल
शिर्डी /संगमनेर – प्रतिनिधी
भाजप व महायुती सरकारने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेण्याची पात्रता यांची नाही. महाराष्ट्रात तोडून फोडून आलेले हे सरकार जनतेला मान्य नाही. महाराष्ट्रातील युवक बेरोजगार करून अनेक उद्योग या सरकारने गुजरातला पळवले असून देशात व राज्यात महागाईचा दहशतवाद वाढला असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली असून खोट्या बोलणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करा, असे आवाहन जनतेला केले आहे. 
शिर्डी येथे शनिवारी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, श्रीरामपूरचे उमेदवार हेमंत ओगले, कोपरगावचे उमेदवार संदीप वर्पे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सुहास वहाडणे, सहप्रभारी बी. एम. संदीप, आमदार रिटा चौधरी, तेलंगणाच्या मंत्री सीताक्का, सचिन गुजर, करण ससाने आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 
प्रियंका गांधी म्हणाल्या, महाराष्ट्र ही संतांची आणि शिवरायांची भूमी आहे. मात्र शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान मोदी व भाजप सरकारने केला आहे. त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे या भूमीमधील आहे. मोदी यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारते आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेते. आता माझे चॅलेंज आहे की मोदी व भाजप सरकारने जातीनिहाय जनगणना करावी. 
महाराष्ट्रात तोडून फोडून सरकार आले. संविधान धोक्यात आले आहे. येथील अनेक उद्योग गुजरातला नेले आहे. महिला सुरक्षित नाहीत. अशा सतत खोटे बोलणाऱ्या सरकारला जनतेने खाली खेचले पाहिजे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये व राज्यात मोफत एसटी प्रवास मिळणार आहे. शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. 
याचबरोबर २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव कांदा कापूस या सर्व पिकांना हमीभाव दिला जाणार आहे. काँग्रेस बोलते ते करते. भाजप सरकार सातत्याने खोटे बोलते. शिर्डी मतदार संघातही मोठा दहशतवाद असल्याने हा विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार थोरात म्हणाले, राहाता मतदारसंघांमध्ये मोठी दहशत आहे. इथे विकास थांबलेला आहे. माझ खुल आव्हान आहे की एकदा संगमनेर शिर्डीच्या विकासावर समोरासमोर लाख दीड लाख लोकांसमोर एकाच व्यासपीठावर चर्चा होऊन जाऊ द्या.
घोगरे म्हणाल्या, मी शेतकऱ्याची मुलगी असल्याने या दहशती विरुद्ध आवाज उठवला आहे. आणि यामध्ये प्रियंका गांधींसह सर्व तालुका एकवटला आहे. शिर्डीमध्ये परिवर्तन नक्की असून सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे रहा.
सभेला प्रचंड मोठी गर्दी….
काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथम आल्या. त्यांची सभा ऐकण्यासाठी सुमारे ५० हजारांच्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होते. यावेळी तरुणाईने केलेले स्वागत अभूतपूर्व होते. मोदींच्या टीकेला दिलेल्या उत्तराने भाजप-सेना युती बॅक फुटवर गेली आहे.

