
- पायाखालची वाळू सरू लागली की माणूस सैरभैर होतो. काय करू, काय नको, असं त्याला होत असतं. राज्यात सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संकटाची चाहूल लागलेले आतापासूनच वायफळ बडबड करू लागले आहेत. त्यांना कधी ‘व्होट जिहादची’ स्वप्न पडतात तर कधी त्यांना ‘बटेंगे तो कटेंगे’ची भीती वाटते. खरं तर यातलं काहीही होत नसतं. पण अशी भीती घातली की हिंदू मतदार आपल्याच मतदान करतील, अशी त्यांची मानसिकता बनते. या माणसांचं राज्यात धर्मा-धर्मात, जाती-जातीत कटूता निर्माण व्हावी, असं वर्तन असतं. त्यांच्या या वर्तनाला घरातूनच विरोध होतो, हे मात्र त्यातल्या त्यात चांगलं लक्षण म्हणता येईल. महाराष्ट्राची विधानसभा आणि विधानसभेतील बहुमत आपल्याच हाती असलं पाहिजे या मानसिकतेत राज्यात सत्ताधारी असलेली महायुती आणि विरोधी पक्षांची महाविकास आघाडी ताकद अजमावत आहे. सुरू असलेल्या प्रचाराने वरचं टोक गाठलं आहे. कोणी दुसर्याला कस्पटासमान गणतो तर दुसरा पहिल्याची उणीदुणी काढतो. आपल्याला वाचवण्यासाठी काहीजण नको तेच गौप्यस्फोट करू लागले आहेत. कधी ते दिवंगत आर. आर. आबांवर घसरतात तर कधी २०१९ च्या सत्तेचा दाखला देत पवारांच्या नावाने खडे फोडतात. महाराष्ट्रासारख्या राज्यात असं घडू शकतं यावर कोणाचा विश्वास नसेल. पण २०२२ च्या पळवापळवीने त्यावर कळस गाठला आणि राज्यात काहीही होऊ शकतं, हे देशाला दाखवून दिलं.
भारतीय जनता पक्ष हा राज्यातील आणि देशातील सर्वात मोठा पक्ष. या पक्षाकडे खरं तर राजकीय पालकत्व असायला हवं. त्या पक्षाकडे नेते, यंत्रणा आणि पैशांची काही कमी नाही. या जोरावर तो पक्ष देशात चांगली राजकीय आखणी करू शकतो. इतकं सारं असताना योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या उघड्या संताला इथे आणून आपण खूपच कद्रू आहोत, हे त्या पक्षाने पक्षाच्या राज्यातल्या नेत्यांनी दाखवून दिलं आहे. अशा व्यक्तीला निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात आणून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे उद्योग भाजपने सुरू केले आहेत. राज्यात एकहाती सत्ता मिळणं हे आता अशक्यतेबाहेरचं सत्य असल्याने कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याची तयारी त्या पक्षाची आणि नेत्यांची आहे. 
यामुळे काही का होईना योगीसारख्या द्वेषाची आग ओकणार्या माणसाला इथे आणून महाराष्ट्र नासवण्याचा प्रयत्न त्या पक्षाने चालवला आहे. राज्यातली प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेत योगींनी आपल्या पोतडीतून द्वेषाचं अस्त्र बाहेर काढलं आणि बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देऊन टाकली. मुस्लिमांची मतं यापुढे आपल्याला मिळू शकत नाहीत, हे सत्य पचवणं भाजपच्या नेत्यांना अवघड झालंय, हेच यातून स्पष्ट होतंय. यामुळे या समाजाला दुखावून हिंदूंची अधिक मतं मिळवण्याचा खेळ त्या पक्षाचा आणि नेत्यांचा आहे.
महाराष्ट्र असल्या संस्कृतीला कधीच थारा देत नाही. बदमाश उमेदवाराला मत का द्या, असं प्रामाणिक मतदाराला वाटत असेल तर त्याला दोष कसा देणार? भाजपचं गेल्या काही वर्षातलं राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलंय की त्या पक्षाला मतं द्यावीत असं सगळ्याच हिंदूंना वाटू शकत नाही. जिथे हिंदूंनाच तसं वाटत नसेल तर तुच्छतेने वागवणारा मुस्लिम मतदार काय म्हणून भाजपचा विचार करेल? मग मुस्लिम समाजाविषयी नरेटिव्ह निर्माण करायचा आणि हिंदूना आपलंसं करायचा हा मसला होय. वास्तवात याच मुस्लिम मतदारांची मदत घेत २०१४ नंतर अनेक निवडणुका भाजपने पदरात पाडून घेतल्या. अन्याय होऊनही अखेरच्या लोकसभा निवडणुकीत त्या समाजाने भाजपला मदत केल्याचं जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसतं. तरीही आपल्याला अपेक्षित असं यश पदरात पडत नाही, हा त्या समाजाचा दोष कसा असू शकतो? 
एकट्या मुस्लिम समाजाला भाजपने अंगावर घेतलं असं मानण्याचं कारण नाही. इतरही अल्पसंख्यांक समाजाला अशीच वागणूक दिली. या समाजाविषयी विष पसरवून त्यांना जिणं हैराण करणार्या असंख्य घटना देशात घडल्या. कोणा एका संशयितावरील कारवाईसाठी त्याच्या खानदानाला रस्त्यावर आणण्याची कारवाई केली गेली. हे सारं वेचून आणि ठरवून केलं जात असताना केंद्रातलं सरकार मौन धारणाची भूमिका घेत असेल तर या समाजाने आपल्याला मतं द्यावी, असं भाजपच्या नेत्यांना कसं वाटू शकतं? अगदी समजाचाच विचार करायचा झाल्यास महाराष्ट्रात मराठा समाज भाजपसाठी मैलाचा दगड ठरू लागला आहे.
खोटी आश्वासनं देऊन त्या पक्षाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न उघडा पडला. केंद्रातल्या मोदी सरकारने ठरवलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा चुटकीसारखा सुटू शकतो. पण मोदींना ते करायचं नाहीए. ज्यांना देशातील आरक्षणच बंद करायचंय ते मराठा समाजाच्या आरक्षणाकडे सहानुभूतीने पाहतील, हे मानणंच खुळेपणाचं आहे. अशावेळी सरसकट सार्या मराठ्यांना दोष देता कसा येईल?
तीच गोष्ट मुस्लिम समाजाची. मुस्लिमांनी सरसकट भाजपच्या विरोधात मतदान केलं असतं तर आज निवडून आलेल्या भाजपच्या खासदारांपैकी तीन खासदार पराभूत झाले असते. मात्र ते मानणं भाजपला सोयीचं नाही. मुस्लिमांना कुरवाळलं तरी त्यांची मतं आता मिळवणं भाजपसाठी अशक्यप्राय बनलंय. अशावेळी त्या समाजाविरोधात ‘व्होट जिहाद’चे नारे द्यायचे आणि परक्या नेत्याकडून बटेंगेच्या घोषणा द्यायला लावायच्या असले उद्योग त्या पक्षाने हाती घेतले आहेत.
व्होट जिहाद या घोषणेची पत्रकार परिषदेत दखल घेणार्या निवडणूक आयोगाने घोषणा करणार्यांवर मात्र काहीच कारवाई केली नाही. यामुळे फडणवीस सारख्यांचा धीर चेपत गेला आणि भर निवडणुकीच्या प्रचारात सातत्याने ते मुस्लिमांना इशारे देत राहिले. महाराष्ट्रात भाजपला बसणार्या संभाव्य धक्क्याची जाणीव योगी यांना येथे आल्या आल्याच झाली. राज्यातल्या सलोख्याचा कोणताच विचार न करता त्यांनी बटेंगेच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. विखार पसरवणार्या या घोषणेचा मुस्लिम समाजावर अपेक्षित असा परिणाम झाला आणि शक्य असलेली मुस्लिमांची मतंही योगींनी हातची घालवली. झालाच पराभव तर त्याला फडवीसांसह योगीही कारण असतील. आता हे सत्य स्वीकारल्याशिवाय भाजपपुढे पर्याय नाही.
एक मात्र चांगलं झालं की महाराष्ट्रात बटेंगे आणि कटेंगेची भाषा चालणार नाही, हे महायुतीच्याच नेत्यांनी पक्ष नेत्यांना जाहीररित्या ऐकवलं. अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी फुटीला चालना देणारा हा प्रचार थांबवा असं जाहीररित्या सांगून टाकलं. अजित पवारांनी तर आपल्या मतदारसंघात जाहीर झालेली योगींची सभा स्वत:हून रद्द करायला लावली. आजवर ज्यांनी भाषा, धर्म, जात न पाहता सहकार्य केलं त्यांना मतांसाठी लाथाडणार नाही, असं बजावत पवारांनी भाजपला घरचा अहेर दिला. त्यापुढे जाऊन पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण आपल्या पक्षाला करून दिली. तेव्हा चव्हाण, पवार, मुंडे यांचाच गैरसमज झाल्याचं सांगत फडणवीस यांनी पुन्हा या घोषणेचं समर्थन केलं.
महाराष्ट्र इतका निर्बुध्द आणि जात्यंध मुळातच नाही. या राज्याला विचारांचा वारसा लाभला आहे. दुसर्या धर्माची निंदा करण्याची शिकवण या राज्याने कधीच आपलीशी केली नाही. यामुळेच असल्या घोषणेचा आसरा घेण्याची गरज राज्यातल्या जनतेला नाही. राज्यात अशा असंख्य वसत्या आहेत जिथे हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने वावरतात. एकमेकांच्या धार्मिक सोहळ्यांचा मान राखतात. दंगलींनंतरही या वसत्या एकमेकांची सुरक्षा राखताना पाहायला मिळतं. त्या सगळ्या वसत्या नासवण्याचे उद्योग योगींकडून सुरू आहेत. हे थांबवणं ही यंत्रणेची जबाबदारी आहे. असं करणार्यांच्या मुसक्या आवळणं यंत्रणेचं काम आहे. पण यंत्रणेवर याच शक्तीचं दडपण असल्याने बटेंगे तो कटेंगेचं रान पेटवणार्यांवर कारवाई होत नाही. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे. निवडणुका आल्या तशा पार पडतील. पण यामुळे दुभंगणारी मनं साधता येणार नाही. मनं साधू नयेत, असं मानणारी जमात भाजपच्या निर्णय प्रक्रियेत असेस्तोवर महाराष्ट्राचं काही खरं नाही..
लेखकाशी संपर्क – ८१६९१३५२५३)

