सोमवार, १८ नोव्हेंबर
संगमनेर – बी. जे. खताळ पाटील यांचे सुसंस्कृत राजकारण व समाजकारण संपूर्ण राज्याला परिचित आहे. मात्र या आडनावाचा वापर करून समोरील व्यक्ती प्रशासनावर दबाव निर्माण करत आहे. पालकमंत्र्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून होत असलेली सेटलमेंट हा काय प्रकार सुरू आहे अशी टीका करताना भाजपकडून तालुक्यात सुरू झालेला धाक व दडपशाही प्रकार निंदनीय असल्याची टीका भाजपच्या आयटी सेलचे सहसंयोजक व नुकताच भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या विक्रमसिंह खताळ यांनी केली आहे.
हॉटेल सेलिब्रेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत पत्नी शिवांगी खताळ होत्या.
विक्रमसिंह खताळ म्हणाले, महसूलच्या अनेक कामांची बंदी असताना एका विशिष्ट कुटुंबासाठी नियम शिथिल करणे. महसूल अधिकारी यांच्यावर सातत्याने दबाव टाकणे. जमिनीचे व्यवहार, तलाठी भरतीमध्ये अनेकांकडून पैसे घेतले मात्र ते परतही केले गेले नाही. असे अनेक उद्योग फक्त खताळ आडनाव वापरून या मंडळीने केले आहे. हे दुर्दैवी आहे.
संगमनेर तालुका हा शांत व सुसंस्कृत विचारांचा आहे. मात्र येथे आता भाजपकडून दडपशाही निर्माण केली जात आहे. खताळ दादांचा विचार हा काँग्रेसचा विचार होता. मात्र समोरच्या उमेदवार हा दर सहा महिन्याला पक्ष आणि विचार बदलत आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार.
त्यांचे अनेक गैरप्रकार आहेत. ते सर्व माध्यमांनी बाहेर काढावे. कोण खरा आहे कोण खोटा आहे हे सर्वांना माहिती आहे. भाजपाची व्यक्तिगत टीका करणारे राजकारण आणि दडपशाहीचे राजकारण आपल्याला आवडत नाही. असे सांगताना यापुढील काळात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असून ते जी जबाबदारी देतील ते आपण पार पाडणार आहोत.
धांदरफळ गट आणि तालुक्यातील जनता यांच्यामध्ये धांदरफळ घटनेमुळे तीव्र संताप निर्माण झाला. या घटनेमुळे मी वसंत देशमुख यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पुढे बोलतच राहिले. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा सन्मानच झाला पाहिजे आणि ती परंपरा थोरात आणि खताळ परिवाराने नेहमी जपली आहे.
मात्र भाजप महायुतीकडून इतक्या खालच्या पातळीचे राजकारण जर कोणी करत असेल तर ती आपली संस्कृती नाही. आणि त्यामुळे मी धांदरफळ घटनेचा निषेध करतोच. मात्र त्यांना समर्थन करणाऱ्या जेवढ्या प्रवृत्ती आहे, त्यांचाही निषेध करतो. विकासाच्या वाटचालीमध्ये सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे असल्याचे ते म्हणाले.
मागील अडीच वर्षात सत्ता आल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून त्यांचे तालुक्यातील गैरप्रकार यांचे अनेक किस्से आहेत. यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. खंडणीखोरीचे काम कोणी करत असेल तर ते चुकीचे असून या चुकीच्या कामांना आमचा कधीही पाठिंबा नाही असे ते म्हणाले.

