सोमवार, १८ नोव्हेंबर
संगमनेर – प्रतिनिधी
राज्यातील मतदारांमध्ये महायुतीच्या कारभाराबद्दल प्रचंड रोषाचे वातावरण असून महाविकास आघाडीबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला १८० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करत असंविधानिक, बेकायदेशीर भ्रष्ट सरकार सत्तेवरून घालून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणे याला आमचे प्राधान्य असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचार संपण्यापूर्वी थोरात सोमवारी दुपारी संगमनेरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जयश्री थोरात यादेखील उपस्थित होत्या.
थोरात म्हणाले, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वत्र सायंकाळी प्रचाराची सांगता होत आहे. राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही. दुधाला भाव नाही. इंधन दरवाढ, ठप्प झालेला विकास यामुळे जनतेच्या मनात महायुतीच्या सरकार बद्दल प्रचंड रोष आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येईल, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्रीपद हे विकास आघाडीसाठी दुय्यम असून सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणणे हेच एकमेव उद्दिष्ट आहे. राज्यघटना, संविधान वाचविण्यासाठी लोकांनी महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीवेळी लोकांनी दिलेल्या निर्णयाला समोरचे लोक वोट जिहाद म्हणत आहे. मग महिलांनी मत दिली त्याला महिला जिहाद, शेतकऱ्यांना शेतकरी जिहाद म्हणणार का असा प्रश्न उपस्थित केला.
महाविकास आघाडीत मेळ असून अजित पवारांचा जर खरंच भाजपाच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला विरोध असेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं असा सल्ला दिला.


