विशेष प्रतिनिधी / मुंबई
राज्यातील विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार अशी शक्यता असतानाच ‘बटेंगे तो कटेंगे’ या योगी आदित्यनाथ यांच्या नाऱ्याने वातावरण निर्मितीत महायुती मागे पडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ‘लाडकी बहीण’मुळे निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती ‘बटेंगे तो कटेंगे’ या प्रचारामुळं पुरती रसातळाला गेल्याचं दिसू लागलं आहे. याचा फटका निवडणुकीत महायुतीला बसू शकतो, असे अंदाज बाहेर येऊ लागले आहेत.
मे 2024 मध्ये देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. यावेळी महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर ‘भटकती आत्मा’ आणि ‘उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे ‘नकली संतान’ अशी टीका केली होती. तर लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजपा संविधान बदलणार, असा प्रचार केला होता. याचा फायदा महाविकास आघाडीला निवडणुकीत दिसून आला. मात्र लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत नको, यासाठी महायुतीने अधिक सावधगिरी आणि खबरदारी बाळगली होती. यात प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ते यशस्वीही झाले.
मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊन ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिला आणि तिथेच चित्र बदलल्याचं दिसून आलं. महायुतीने आपल्या बाजूंनी जी वातावरणनिर्मिती केली होती ती एका ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेने फसली. केंद्रातील अनेक नेते महाराष्ट्रात येऊन प्रचार करीत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा दिला. याचा कित्ता राज्यातील भाजपा नेत्यांनी गिरवला. जनतेला हे पटलेलं दिसत नाहीय, यावरून लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
भाजपा समाजात जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करीत आहे, अशी धारणा लोकांची होत चालली आहे. जाती, धर्माशिवाय भाजपा निवडणूक लढवू शकत नाही का? असं जनसामान्यांना वाटतंय. या सर्वांचा परिणाम म्हणून ‘बटेंगे तो कटेंगे’ यामुळं महायुतीला विधानसभा निवडणुकीत फटका बसेल, असं सांगितलं जातं.
एकीकडे महायुतीने ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिलाय. हा नारा म्हणजे हिंदूंनी एकत्र व्हावं. एकत्र राहावं आणि या नाऱ्यातून अप्रत्यक्षरीत्या मुस्लिम मतदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेलाय. परंतु दुसरीकडे महायुतीतच ‘बटेंगे तो कटेंगे’ या प्रचारातील घोषणेवरून त्यांच्यातच एकवाक्यता किंवा समन्वय दिसून येत नसल्याचं चित्र होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ याला विरोध केलाय. भाजप आमदार पंकजा मुंडे यांनीही ‘बटेंगे तो कटेंगे’ हा चुकीचा प्रचार असल्याचं म्हटलं. आपण याचं समर्थन करत नसल्याचं मुंडेंना म्हटलंय.
दरम्यान, अजित पवार किंवा अशोक चव्हाण हे बाहेरून आलेले आहेत, मात्र पंकजा मुंडे ह्या मूळ भाजपातील आहेत आणि त्यांनीच ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध केल्यामुळं महायुतीतच एकवाक्यता किंवा त्यांच्यात मतभिन्नता दिसून येत आहे. दरम्यान, ‘बटेंगे तो कटेंगे’ या प्रचारावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आता सारवासारव करावी लागत असल्याचं दिसून येतंय.
एकूणच ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा भाजपाच्याच अंगाशी येत असल्याचं चित्र आहे. सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा दिल्यानंतर वोट जिहादवरून धर्मयुद्धाची भाषा करणारे देवेंद्र फडणवीसांनादेखील लक्ष्य केलं जातंय. परिणामी महायुती आणि मुख्यत: भाजपा कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. ‘बटेंगे तो कटेंगे’ वरून भाजपावर सर्व बाजूंनी टीकास्त्र डागलं जात असल्याचं पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याचा उच्चार सभेत टाळला. परिणामी आपल्यावर टीका होत आहे हे लक्षात आल्यामुळं भाजपाने घूमजाव केलंय.

